आर्णी-केळापूरचे भाजपा आ. राजू तोडसाम यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

0
17

यवतमाळ :दि. २८ : : वीज वितरण कंपनीच्या लेखा सहायकाला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आर्णी-केळापूरचे भाजपा आ. राजू तोडसाम यांना येथील तिसरे सहदिवाणी न्यायाधीश एच.ए. वाणी यांनी तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

विजेची अवाजवी देयके आल्याची तक्रार घेऊन भाजपाचे तत्कालीन तालुकाध्यक्ष राजू तोडसाम हे १७ डिसेंबर २०१३ रोजी पांढरकवडा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेले होते. त्या ठिकाणी वीज कर्मचाऱ्याने दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान न झाल्याने लेखा सहायक विलास आकाते यांना शिवीगाळ केली. तसेच कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पांढरकवडा पोलिसांत देण्यात आली. या प्रकरणात न्या. एच.ए. वाणी यांनी १० साक्षीदार तपासले. आरोप सिद्ध झाल्याने राजू तोडसाम यांना भादंविच्या २९४ कलमान्वये ३ महिन्यांचा कारावास आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी एक महिना कारावास, भादंविच्या ३५३ कलमान्वये ३ महिने कारवास व ५० रुपये दंड, दंड न भरल्यास १० दिवसांची शिक्षा ठोठावण्यात आली.