पुढील निवडणुकीत जनता मोदींना धूळ चारेल – यशवंत सिन्हा

0
13

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले आहे. मोदींची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधींशी करत सिन्हा यांनी मोदींचा नामोल्लेख न करता घणाघाती टिका केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील निवडणुकीत जनता भाजपला चांगलीच धूळ चारेल, असा टोलाही सिन्हांनी यावेळी लगावला.सिन्हा म्हणाले, देशात आणीबाणीनंतर कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता, तशीच स्थिती पुढील निवडणुकीत भाजपवर ओढावणार आहे. जनता सगळ्या गोष्‍टी लक्षात ठेवत असते.

 पणजी येथील एका महाविद्यालयात आयोजित ‘डिफिकल्ट डायलॉग‘ या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी मोदींचा उल्लेख न करता सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘ जनतेशी संवाद साधणे, ही भारतीय लोकशाहीची मोठी ताकद आहे. पण, सध्या तसे होताना दिसत नाही… संवाद बिलकूल राहिलेला नाही. थोड्याफार चुका होऊ शकतात, पण सध्याची स्थिती बघता काळजी वाटते’ असे सिन्हा म्हणाले. ‘ भारतीय समाज सगळं लक्षात ठेवतो आणि याच गोष्टीचा भविष्यात फटका बसू शकतो. संवादावर विश्वास नसणा-यांना भारतातील नागरिक पुढील निवडणुकांमध्ये धूळ चारतील. इंदिराजींच्या काळातही अशीच डोळेझाक केली होती आणि त्यावेळी सरकार फक्त १९ महिनेच टिकू शकले होते,’ याची आठवणही सिन्हा यांनी करून दिली.