सिंचन खात्यातील गैरव्यवहार काढा -माणिकराव ठाकरे

0
9

नागपूर : सिंचन खात्यात झालेला गैरव्यवहार खणून काढा, अशी मागणी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी शुक्रवारी विदर्भाच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत केली.

विदर्भाच्या मागासलेपणासाठी या भागात सिंचनाची सोय नसणे हे प्रमुख कारण आहे़ याकडे लक्ष वेधताना ठाकरे म्हणाले की, सिंचन खात्यात कालवे दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. अरुणावती प्रकल्पाच्या कालव्यांमध्ये झाडे वाढली आहेत. या कामासाठी आलेला निधी गेला कुठे? या कामावर आतापर्यंत किती खर्च झाला, हे सरकारने जाहीर करावे तसेच सिंचन खात्यातील गैरव्यवहार खणून काढावा.

सावकारांचे कर्ज माफ करण्याच्या घोषणेचा सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांनी केली. यापेक्षा शेतकऱ्यांना रोख मदत करावी, असे ते म्हणाले.

विदर्भाच्या विकासासाठी सुप्रशासन व राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे मत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. विदर्भाचा अनुशेष दूर करताना विदर्भावर गत सरकारकडून अन्याय झाला, असे विदर्भाच्या प्रश्नावरील चर्चेला उत्तर देताना महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले.