देशाच्या रक्षणार्थ सैनिकांचे कार्य अनन्यसाधारण- अभिमन्यू काळे

0
25

ध्वजदिनी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा
गोंदिया,दि.३१ : अन्न, वस्त्र आणि निवारा हया मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. यापैकी एक गरज जरी कमी पडली तर आपण अस्वस्थ होतो. शत्रूंचा हल्ला झाल्यास आपण मुलभूत गरजांपेक्षा सुरक्षित राहण्याकडे लक्ष देतो. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे आज आपण सुरक्षीत जीवन जगत आहोत. देशाच्या रक्षणार्थ लढणाऱ्या सैनिकांचे कार्य अनन्यसाधारण असल्याचे गौरोदगार जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी काढले.
आज ३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी काळे बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे व देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, आपण आपल्या हक्कांबाबत लढत असतो. हक्क मागण्याचे जे अधिकार प्राप्त झाले ते सैनिकांमुळे. ते देशाच्या रक्षणासाठी कठीण परिस्थितीचा सामना करीत असतात. आपण त्यांच्यामुळे आज सुरक्षित जीवन असल्याचे सांगितले.डॉ.पुलकुंडवार म्हणाले, सैनिक त्याग करुन देशासाठी लढतात. त्यांच्या ऋणाची परतफेड करण्यासाठी अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. देशासाठी वीर मरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम करण्यात येत आहे. अशा कुटुंबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी जास्तीत जास्त निधी संकलीत करुन त्यांना मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.श्री.जवळे म्हणाले, देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांचा त्याग महत्वाचा आहे. देशसेवा कठोरपणे करणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. त्यांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलनाच्या कामास सर्वांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकातून कॅप्टन लिमसे यांनी ध्वजदिन निधीचे महत्व, सैनिकांसाठी असलेल्या योजना, पाल्यांच्या शैक्षणिक विकासाला हातभार लावण्यासाठी करण्यात येत असलेल्या मदतीबाबतची माहिती दिली.यावेळी १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुणाने उत्तीर्ण झालेल्या आस्मा खान, तृप्ती बिसेन यांचा सत्कार, तर गायत्री पटले, सोनू बांगरे, सुधांशू बावनथडे या माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. वीर पत्नी श्रीमती किरण पटले, श्रीमती राजश्री क्षीरसागर, वीर माता रुख्मीनी बिसेन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून तर जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनाचे सन २०१६ या वर्षात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, सार्वजनिक न्यासच्या सहायक धर्मदाय आयुक्त ममता रेहपाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, सालेकसा व अर्जुनी/मोरगावचे दुय्यम नोंदणी निरिक्षक, तहसिलदार गोंदिया, अप्पर तहसिलदार गोंदिया, तहसिलदार गोरेगाव, सालेकसा, आमगाव, देवरी, तिरोडा व अर्जुनी/मोरगाव गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रतिनिधींचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू, प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, त्यांचे कुटुंबिय व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कल्याण संघटक जगदिश रंगारी यांनी मानले.