जालना जिल्ह्याचा राष्ट्रीय सन्मान, ‘प्रधानमंत्री पुरस्काराने’ गौरव

0
13

नवी दिल्ली, दि. २१ : ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जालना जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना ‘प्रधानमंत्री पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना दरवर्षी २१ एप्रिल रोजी ‘नागरी सेवा दिनी’ ‘प्रधानमंत्री पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. येथील विज्ञानभवनात प्रशासन सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१५-१६ साठी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले. प्रशासन सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागाचे राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, प्रधानमंत्री यांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा, कॅबीनेट सचिव पी.के.सिन्हा यावेळी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री ग्राम सिंचन योजना’,‘दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना’, ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’,‘स्टँडअप इंडिया’-‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट’या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या जिल्हाधिका-यांना विविध श्रेणींमधे पुरस्कार देऊन या कार्यक्रमात गौरविण्यात आले. राज्यांच्या श्रेणीमध्ये ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणारे जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
जालना जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षात खरीप हंगामात शेतक-यांनी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनें’अंतर्गत एकूण २५ कोटी विमा हप्ता भरला आणि जिल्हयातील पीक विमा घेतलेल्या ९५ टक्के शेतक-यांना ४३१ कोटी ६४ लाख रूपये नुकसान भरपाई मिळाली. याच वर्षात रब्बी हंगामात शेतक-यांनी २ कोटींचा विमा हप्ता भरला आणि त्यांना ४४ कोटी २९ लाख रूपयांची नुकसान भरपाई मिळाली. वर्ष २०१६-१७ मध्ये जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून खरीपात ४ लाख ६९ हजार आणि रब्बी मध्ये १ लाख २७ हजार शेतक-यांनी ३९ कोटी रूपयांचा विमा हप्ता भरून पिक विमा योजनेत भाग घेतला.
‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’ची अंमलबजावणी करणा-या देशातील सर्वच जिल्हयांनी प्रधानमंत्री पुरस्कारासाठी अर्ज केला होता. देशातील १२ जिल्हयांची यातून निवड करण्यात आली व त्यांचे सादरीकरण झाले , यानंतर अंतिम ४ जिल्हयांमधून जालना जिल्हयाची निवड करण्यात आली.
देशातील १० नाविन्यपूर्ण योजनांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्वाकांक्षी योजनेची निवड करण्यात आली. नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून देशातील नाविन्यपूर्ण अशा विविध प्रकल्पांची ‘न्यू बिगनिंग’ नावाची पुस्तिका तयार करण्यात आली,या पुस्तिकेचे प्रकाशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
देशभरातील ८०३ योजनांपैकी १० योजनांची निवड नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी करण्यात आली त्यात महाराष्ट्र शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा समावेश आहे. विज्ञानभवनात नागरीसेवा दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनीत देशातील १० नाविन्यपूर्ण प्रकल्पात महाराष्ट्राच्या  दालनास विविध क्षेत्रातील मान्यवर व अधिका-यांनी भेट दिली व या योजनेचे कौतुक केले.