राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

0
16

ठाणे, दि.16 –  दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल- डिझेलचे दर, घरगुती गॅसची दरवाढ, अन्नधान्याच्या वाढत असलेल्या किमती आणि लोडशेडिंग याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला. मोर्चेक-यांनी मासुंदा तलाव येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन या सत्ताधा-यांना सद्बुद्धी द्या, अशी विनंती करत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी जितेंद्र आव्हाड असे म्हणाले की ”देशात मोठ्या प्रमाणात महागाईचा आगडोंब उसळला आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर मोठया प्रमाणात वाढले आहेत. अन्नधान्य महाग झाले आहेत. अच्छे दिनचे आश्वासन देऊन मोदी यांनी नागरिकांना बुरे दिनच दाखवले आहेत”, असा आरोप करत ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने जांभळी नाका ते मासुंदा तलाव येथील शिवाजी महाराज पुतळादरम्यान मोर्चा काढला. या मोर्चात बैलगाडी, सायकलस्वार आदी सहभागी झाले होते. यावेळी रिकामे गॅस सिलिंडरसह महिला कार्यकर्त्यांनी जोरदार थाळीनाद केला. जितेंद्र आव्हाड यांनी बैलगाडी हाकून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मंदार किणे यांनी सायकल चालवून मोदी सरकारचा निषेध केला.