शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रीय शेतीतून धानाचे उत्पादन घ्यावे-जिल्हाधिकारी काळे

0
13

प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी चाखली भाताची चव
गोंदिया,दि.२८ : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेण्यात येते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे या उत्पादित धानातून एक प्रकारे विषच खाण्यात येत आहे. भविष्यातील धोके ओळखून व उत्पादित धानाला चांगला भाव मिळावा सोबतच आपले आरोग्य सुदृढ राहावे आणि जमिनीची पोत सुधारावी यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणात सेंद्रीय शेतीची कास धरुन धानाचे उत्पादन घ्यावे. असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.
कारंजा येथील तालुका बीज गुणन प्रक्षेत्रातील कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालयाच्या वतीने प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी सेंद्रीय तांदूळापासून तयार केलेला भात खाऊ घालण्याचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधतांना श्री.काळे बोलत होते. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.टी.शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, गोंदिया जिल्ह्यासाठी कृषि आयुक्तालयाने परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये २० गटांना मंजूरी दिली आहे. प्रति गट ५० शेतकऱ्यांना व प्रति शेतकरी १ एकर याप्रमाणे योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या ३१ गटांना सन २०१७-१८ वर्षाकरीता सेंद्रीय शेती राबविण्याची मंजूरी दिली आहे. जिल्ह्यात एकूण ५१ सेंद्रीय गटामध्ये २३४६ शेतकरी सेंद्रीय शेती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
धान उत्पादक शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, आपल्या दररोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेला भात हा विषमुक्त कसा राहील याचे नियोजन करण्यात आले आहे. सेंद्रीय तांदूळ उत्पादनामुळे शेतकऱ्यांना त्याची चांगली किंमत सुध्दा मिळणार आहे, त्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पादन सुध्दा वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पक्षांना सुध्दा विषमुक्त अन्न मिळेल. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची चळवळ बळकट व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी तरतूद करणारा राज्यातील गोंदिया हा एकमेव जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले.
सेंद्रीय शेतीमधील उत्पादित सेंद्रीय तांदूळ शिजवून खाऊ घालणे हा कार्यक्रम तालुका व जिल्हास्तरावर राबविण्यात येत असल्याचे सांगून श्री.काळे पुढे म्हणाले, आतापर्यंतच्या कार्यक्रमात जवळपास १५०० लोकांनी सेंद्रीय तांदूळाचा आस्वाद घेतला आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री कार्यक्रमामध्ये ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जय श्रीराम व एचएमटी या तांदूळाची प्रति किलो ६० रुपये याप्रमाणे ४ क्विंटल सेंद्रीय तांदूळाची विक्री करण्यात आली. सेंद्रीय तांदूळ खरेदीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात उत्सुकता दाखविली आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना सेंद्रीय शेतीतील उत्पादित सेंद्रीय तांदूळ शिजवून खाऊ घालण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
श्री.चव्हाण माहिती देतांना यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील २३७२ शेतकरी ५१ गटामार्फत सेंद्रीय शेतीमधून तांदूळ उत्पादित करीत आहेत. परंतू यावर्षी कमी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जवळपास ११६८० क्विंटल सेंद्रीय तांदूळाचे उत्पादन होऊ शकते. यामधून जवळपास ७११६ क्विंटल तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति कुटूंब १० ते ५० किलो सेंद्रीय तांदूळ देण्याचे नियोजन आत्मा कार्यालयामार्फत सुरु असल्याचे सांगून श्री.चव्हाण म्हणाले, सदर तांदूळ खरेदीकरीता ग्राहकांनी फेसबुकवर Organic Gondia (ATMA किंवा ९५०३५२५६७२ या भ्रमणध्वनीवरील व्हॉटस् ॲपवर नोंदणी करावी. नोंदणीकृत ग्राहकांना मागणीनुसार डिसेंबर पहिल्या पंधरवाड्यापर्यंत तांदूळ उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच ग्राहकांनी आपल्या क्षेत्रातील तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कृषि विभाग कार्यालय येथे सुध्दा नोंदणी करावी असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.