निवडणुकीपूर्वी आणीबाणी येणार-रामदास फुटाणे

0
29

पुणे,दि.30-‘देशात २०१९च्या आधी आणीबाणी जाहीर होईल. काँग्रेसने आणीबाणीत जनतेला अठरा महिने तुरुंगात ठेवले, हे भाजपचे सरकार ३६ महिने तुरुंगात ठेवेल. देशातील परिस्थिती प्रक्षोभक होत आहे. अशा वातावरणात सरकारला सदबुद्धी मिळो. लोकशाही जिवंत राहो…’ अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी गुरुवारी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित सांस्कृतिक कट्टा उपक्रमात ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शैलेश काळे व सरचिटणीस दिगंबर दराडे उपस्थित होते. फुटाणे यांनी या वेळी जामखेड ते बर्लिनपर्यंतचा प्रवास, सामना चित्रपटाची निर्मिती, शिक्षक, वात्रटिकाकार, आमदार अशा विविध भूमिका, तसेच राजकीय मंडळींच्या गमती-जमती आणि स्नेह अशा विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या. बदललेली राजकीय, आर्थिक व्यवस्था, तसेच जातीय मोर्चे यावर त्यांनी घणाघात केला.‘जगात हिंसा वाढत चालली आहे. सरकार विरोधी लिहिले म्हणून नोटिस पाठवणे वाईट आहे. अशा प्रकारांचा निषेध केला पाहिजे,’ असे फुटाणे यांनी आवर्जून नमूद केले. ‘समाजाचे प्रश्न आर्थिक असताना जातीचे मोर्चे निघत आहेत. राजकारण हा बागायतदार, जमीनदारांचा खेळ आहे. पूर्वीच्या राजकारणाला वैचारिक बैठक होती. आता ते उत्पन्नाचे साधन आहे; पण सत्तेची भूक सर्व काळात सारखीच असते. देशाची तीस वर्षे जात गोंजारण्यात गेली आहेत. जाती घट्ट केल्यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. व्यासपीठावर फुले, शाहू, आंबेडकर नारा देणारे खाली आले की मात्र जात पाळतात. मतदारसंघात जातीची घरे किती हा विचार केला जातो. देशापेक्षा धर्म, धर्मापेक्षा जात आणि जातीपेक्षा पोटजात महत्त्वाची झाली आहे. जात आणि धर्माच्या विरोधात बोलण्याची हिमंत कोणत्याही राजकीय पक्षात नाही. हे राजकारण देशाची वाट लावत आहे,’ असा हल्ला फुटाणे यांनी चढवला.