गाईला जपायचं अन् ताईला झोडायचं, हे कसलं हिंदुत्त्व? : उद्धव ठाकरे

0
47

“रेल्वेमंत्री आता बोलायला लागलेत की, पूल प्रशस्त होणार आहेत. हे तुम्हाला आज सुचलं? जिथे जिथे गर्दी होते, तिथले पूल, जिने रुंद करण्यासाठी आपल्याला अक्कल येणार आहे की नाही? एखादी दुर्घटना घडली की, उच्च समिती नेमतात. पण त्या अधिकाऱ्यांना म्हणावं, समिती नेमू नका. तुम्ही त्या जिन्यावरून उतरून दाखवा”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला.“कुणी मागितली बुलेट ट्रेन? मग हा सगळा खटाटोप कोणासाठी? तमाम माता-भगिनींच्या स्वप्नांचा चुराडा करून तुम्ही चांगली स्वप्न बघता. फुकट नागोबा कशाला हा? हे सगळं फुकट मिळते म्हणून हे चाळे सुरू आहेत. ज्या जनतेने निवडून दिले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनचा विरोध केला.

भाजपच्या देशातल्या कारभारावर कडवड टीका करताना ते म्हणाले, “देशात सगळीकडेच कारभार बिघडलाय सगळीकडे नुसता चिखल झालाय. असं म्हणतात की चिखलात कमळ उगवतं पण इथं कमळ तर कुठेच दिसत नाही मळ मात्र सगळीकडेच दिसत आहे. पेट्रोलच्या वाढत्या दराबद्दल त्यांनी टीका करून याचे दर उतरवणयची गरज असल्याचे सांगितले.

हिंदू मत फुटू नये यासाठी आमची भाजपशी युती असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. मात्र वंदे मातरम्‌ प्रकरणावरून भाजपला त्यांनी कडक शब्द सुनावले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आम्हाला राष्ट्रपती म्हणून हवे होते याचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र जीएसटी लागू करताना मुंबईच्या उत्पन्नाची हमी दिल्याबद्दल अर्थमंत्री अरुण जेटली यांचे त्यांनी आभार मानले. देशातला भ्रष्टाचार कमी झाला नाही तसेच काळा पैसाहीवबाहेर आला नाही नोटाबंदी पूर्ण फसली, अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे
– संपूर्ण देशामध्ये कारभाराचा विचका झालेला आहे. चिखलातून कमळ उगवतं असं म्हणतात. पण मळ दिसतोय कमळ कुठे दिसत नाही.
– गर्दीच्या ठिकाणचे सर्वच रेल्वे पूल आणि जिने रुंद करा, फक्त मुंबईतलेच नाही तर ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील सर्व पूल, जिने रुंद करा.
– समान कर लावला असेल तर समान दरही लावा. पेट्रोल, डिझेलवरचे दरही समान ठेवा.
– संपूर्ण देशामध्ये पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवा तरच सरकार टिकेल, उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन.
– अच्छे दिन येण्याची स्वप्नं पाहात जनता जगतेय.
– मोहन भागवत यांनी रोहिंग्याचा विषय मांडला. ते आपल्याकडे घुसत आहेत. त्या रोहिंग्या मुस्लिमांना हाकला.
– सत्तेत राहून सरकारवर अंकूश ठेवतो. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शिवसेनेची भूमिका.
– नोटाबंदीवर देशात सर्वात आधी आम्ही बोललो.
– तिरंग्याशी गद्दारी शिवसेना कदापी करणार नाही. पण सत्तेसाठी तुम्ही लाचार होऊन काश्मीरमध्ये उपमुख्यमंत्री झालात.
– शिवसेना संपण्याचा प्रयत्न करून बघा. अनेक आले आणि अनेक गेले.
– लालकृष्ण अडवाणींना पंतप्रधान का केलं नाही?
– नवे मित्र जोडत आहेत. पण कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना नको झाली आहे.
– गाईला जपायचं आणि ताईला बदडायचं हे असलं हिंदुत्व आम्हाला नको.
– बेधडक राहून सत्तेत साथ देत आहोत. उघडपणे साथ देतोय. तुमच्या सारखे अदृश्य हात देऊन लपवाछपवी करत नाही, उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर बोचरी टीका.
– ज्या क्षणी हिंदुत्व फुटेल तेव्हा तुमचंही नशीब फुटेल, भाजपला इशारा
– महागाई, हिंदुत्व, महिलांचं रक्षण आणि शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने आंदोलन.