गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ४९ तलावातून काढला २४ हजार घनमीटर गाळ

0
36
????????????????????????????????????

गोंदिया,दि.६ : तलावाचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. सोळाव्या शतकात इथल्या मालगुजारांनी सिंचनाची व्यवस्था म्हणून आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तलावांची निर्मिती केली. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने सिंचनासाठी धरणे बांधली. आता या तलाव आणि धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे तलाव आणि धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. यांना पुनर्रज्जीवित करुन त्यांची मुळ साठवण क्षमता पुर्न:स्थापित करण्यासोबतच कृषि उत्पन्नात भरीव वाढ देखील होत आहे. यासाठी राज्य शासनाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही अभिनव योजना ६ मे २०१७ च्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयानुसार राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात या योजनेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले.
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील २९० तलावांची निवड गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेत पहिल्या वर्षी करण्यात आली. त्यापैकी ४९ तलावांमधून गाळ काढण्याचे काम करण्यात आले. लोकसहभागाच्या या कामात ३७२ शेतकऱ्यांनी देखील आपला सहभाग नोंदवून लाभ घेतला. जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायती अंतर्गत ही कामे करण्यात आली. तलावात साचलेला सुपिक गाळ शेतीमध्ये टाकून शेतीची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात आला. जवळपास २४ हजार ९३.२ घनमीटर गाळ तलावांमधून काढण्यात आला. काढलेला काही गाळ ४४ हेक्टर शेतीत टाकण्यात आला.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून पहिल्या वर्षी करण्यात आलेल्या या कामामधून जलसाठ्यांची पुनर्स्थापना करण्यात हातभार तर लागलाच सोबत जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत शाश्वत स्वरुपात वाढ होण्यास मदत झाली. या योजनेतून गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचा ३७२ शेतकऱ्यांनी लाभ तर घेतलाच सोबत या योजनेत त्यांचा सहभाग देखील महत्वपूर्ण ठरला. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खताच्या खर्चात बचत झाली. या योजनेमुळे तलाव गाळमुक्त होण्यास मदत तर होतच आहे सोबत शेती गाळयुक्त होत आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढत आहे. उत्पादकता वाढीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे.