महात्मा ज्योतिबा जलमित्र पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वितरण

0
15

मुंबई, दि. 3 : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार तसेच इतर  विविध पुरस्कारांचे वितरण गुरुवार, दि. 4 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. येथील  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 3.30 वा. कार्यक्रम होणार आहे.
सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सन 2015-16 या वर्षात या योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ती, संस्था,
अधिकारी व पत्रकारांना महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. या पुरस्कार विजेत्यांना गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, मृद व जलसंधारण राज्य मंत्री विजय शिवतारे, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक आदी उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार व जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देण्यात येणार आहेत.
जलमित्र पुरस्कार विजेत्यांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे.राज्यस्तरावरील महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र प्रथम पुरस्कार मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर), द्वितीय क्रमांक वेळू (ता. कोरेगाव, जि.सातारा), कर्जत (ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांना जाहीर झाले आहेत. तर राज्यस्तरावरील तालुका संवर्गामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यास प्रथम, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यास द्वितीय तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड जिल्ह्यास तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर जिल्हा प्रवर्गामध्ये सोलापूर जिल्ह्यास प्रथम तर पुणे व अहमदनगर जिल्ह्यात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाले आहेत.
सामुदायिक/अशासकीय संस्थांमध्ये प्रथम पुरस्कार संस्कृती संवर्धन मंडळ,सगरोळी ता.बिलोली, जि.नांदेड यांना, तर द्वितीय पुरस्कार आर्ट ऑफ लिव्हिंग सेवा भावी संस्था, जालना यांना देण्यात येणार आहे. वैयक्तिक पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार संजय ज्ञानोबा शिंदे, नेकनुर ता. जि. बीड व द्वितीय पुरस्कार सुभाष उत्तमराव नानवटे, रा. दोडकी, ता.जि.वाशिम यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करणाऱ्या पत्रकारांमध्ये प्रथम पुरस्कार अविनाश अंकुशराव कदम, दै.पुण्यनगरी, पुणे, ; द्वितीय पुरस्कार संदीप दत्तू नवले, ॲग्रोवन,अहमदनगर, ; तृतीय पुरस्कार संगिता हनुमंतराव
भापकर, दै.सकाळ यांना, तर इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये प्रथम पुरस्कार रविंद्र शिवाजी कांबळे, सांगली, ; द्वितीय पुरस्कार शशांक रमेश चवरे,अमरावती, ; तृतीय पुरस्कार शशिकांत पाटील, लातूर यांना सन्मानित करण्यात
येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये राज्यस्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल सहसचिव वि.सि.वखारे, अवर सचिव ना.श्री.कराड, अवर सचिव  शंकर जाधव, सहायक कक्ष अधिकारी सुनील गवळी यांनाही गौरविण्यात येणार आहे.