जययुक्त शिवारमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन -मुख्यमंत्री

0
9

मुंबई –  शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी तसेच सरकारी यंत्रणांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळेच तीन वर्षात राज्यातील अकरा हजार गावे जलपरिपूर्ण झाली़ या वर्षी आणखी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. जलयुक्तमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे़ या गतीने पुढील दोन वर्षे कामे केली तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ति, संस्था, अधिकारी व पत्रकारांना आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराचे वितरित करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्य मंत्री विजय शिवतारे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जलयुक्त शिवार योजनेच्या लोगोचे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लोगो तयार स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या किशोर गायकवाड याचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
निसर्गावर, पावसावर अवलंबून राहलो तर शेतीचा शाश्वत विकास होऊ शकणार नाही. राज्यातील सर्व धरणे भरली तरीही ५० टक्के क्षेत्र पाण्याखाली येऊ शकणार नाहीत. त्यामुळे या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. जलयुक्त योजना राबविताना जिल्हाधिका-यांच्या अधिकाराखाली या सर्व योजना एकत्र केल्या. यामुळे पहिल्याच वर्षी जलयुक्त योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. लोकसहभाग व प्रशासन हेच या योजनेचे खरे शिल्पकार आहेत. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढणार असून अधिक वेगाने काम करायचे आहे. टाटा ट्रस्टने दिलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक अचूक कामे करण्यात येतील. पुढील काळात याच पद्धतीने कामे केली तर दुष्काळ हा भूतकाळ असेल आणि कमी पावसातही राज्यातील शेतकरी शाश्वत शेती करू शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुरस्कार विजेते-
राज्यस्तरावरील महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र प्रथम पुरस्कार मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर), द्वितीय क्रमांक वेळू (ता. कोरेगाव, जि. सातारा), कर्जत (ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांना तर राज्यस्तरावरील तालुका संवर्गामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यास प्रथम, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यास द्वितीय तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यास तृतीय पुरस्कार देण्यात आले. तर राज्यस्तरीय जिल्ह्यांचे पुरस्कारामध्ये सोलापूर जिल्ह्याचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पुण्याचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव व अहमदनगर जिल्ह्याचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी स्वीकारला. तर विभागस्तरावर प्रथम आलेल्या जिल्ह्यांचा पुरस्कार कोकण विभागातून ठाणे जिल्ह्याचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, नाशिक विभागातून अहमदनगर जिल्ह्याचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे,औरंगाबाद विभागाचा पुरस्कार उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, अमरावती विभागातून अमरावतीचे तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते व नागपूर विभागातून नागपूरचे अपर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

सामुदायिक/अशासकीय संस्थांमध्ये प्रथम पुरस्कार संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी ता.बिलोली, जि.नांदेड यांना, तर द्वितीय पुरस्कार आर्ट ऑफ लिव्हिंग सेवा भावी संस्था, जालना यांना देण्यात आला. वैयक्तिक पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार संजय ज्ञानोबा शिंदे, नेकनूर ता. जि. बीड व द्वितीय पुरस्कार सुभाष उत्तमराव नानवटे, रा. दोडकी, ता.जि.वाशिम प्रदान करण्यात आला.

पत्रकारांसाठीचा प्रथम पुरस्कार अविनाश अंकुशराव कदम, दै.पुण्यनगरी, पुणे; द्वितीय पुरस्कार संदीप दत्तू नवले, ॲग्रोवन,अहमदनगर; तृतीय पुरस्कार श्रीमती संगीता हनुमंतराव भापकर, दै.सकाळ यांना, तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रथम पुरस्कार रवींद्र शिवाजी कांबळे, सांगली; द्वितीय पुरस्कार शशांक रमेश चवरे, अमरावती; तृतीय पुरस्कार शशिकांत पाटील, लातूर यांना देण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये राज्यस्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल सहसचिव वि.सि.वखारे, अवर सचिव ना.श्री.कराड, अवर सचिव शंकर जाधव, सहायक कक्ष अधिकारी सुनील गवळी यांनाही गौरविण्यात आले.