विद्यार्थी-शिक्षक संघटनांचा आंदोलनाचा इशारा

0
14

मुंबई दि.23(विशेष प्रतिनिधी)- पटसंख्या आणि गुणवत्तेचे कारण पुढे करून 15 वर्षांत राज्यातील 80 हजार शाळा बंद करण्याची घोषणा करणाऱ्या राज्याच्या शिक्षण विभागाविरोधात विद्यार्थी-शिक्षक संघटनांनी एल्गार पुकारला आहे. येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र विद्यार्थी शिक्षक नागरी कृती समितीने दिला आहे. पटसंख्या आणि खालावलेल्या गुणवत्तेला शिक्षण विभागच कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थी शिक्षक नागरी कृती समितीने केला. मुंबई मराठी पत्रकार संघात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत, राज्यातील एकही शाळा बंद होऊ देणार नाही, असा निर्धार कृती समितीने केला. शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता ढासळली आहे. शिक्षणमंत्र्यांनी कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेतली हे सर्वप्रथम जाहीर करावे, असे आव्हानही “ऑल इंडिया युथ फेडरेशन’च्या गिरीश फोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिले.