राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची दत्तक गाव ‘जवर’ला भेट,

0
11

नरेश तुप्तेवार
नांदेड : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दत्तक घेतलेल्या जवर (ता. किनवट) या गावाला सदिच्छा भेट देली. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन केले. गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी जवर गावाच्या समृद्धीसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवर गावाचे सरपंच भुपेंद्र आडे यांनी राज्यपालांचे स्वागत केले. तर शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, की आदिवासी भागातील जवर हे गाव दत्तक घेतल्यानंतर विकासाभिमूख होत आहे. या परिसरातील जवळपास २ हजार एकरपर्यंत सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेती फारशी फायदेशीर ठरत नाही. ही गरज ओळखून प्रशासनाने या भागात सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी २-३ पर्याय असलेले सविस्तर प्रस्ताव तयार करावेत. त्याला मंजूरी देऊन सिंचनासाठी फायदेशीर मार्ग अवलंबला जाईल, असे सांगत त्यांनी ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे.
अंबाडीला जाणाऱ्या जुन्या दळणवळणाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वन विभागाकडून संमती मिळविण्यात येईल, असे सांगून राज्यपालांनी सध्या गावात होत असलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले. क्रीडा संकुलातील सुविधांचा उपयोग करुन गावातील मुलांमुलींनी आपले क्रीडाकौशल्य विकसित करावे, असे आवाहन त्यांनी केले. वन संपत्तीवर त्या क्षेत्रातील आदिवासींना पूर्ण अधिकार राहिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. गाव परिसरातील शेती समृद्धीच्या विकासासाठी कृषि विद्यापीठाचे तज्ज्ञ पाठविणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. राज्यपालांनी तरुण-तरुणींना पुढाकार घेऊन गाव विकासाच्या नवनवीन संकल्पना समोर आणण्याचे आवाहन केले.

या विकासकामांचे झाले उद्घाटन

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून २ लाख रुपये अनुदानातून जंगुबाई आदिवासी महिला शेतकरी गटाने सुरू केलेल्या दालमिलचे उद्घाटन करण्यात आले. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून ७ लाख ५० हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच २ कोटी ९५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. भूमिपूत्र शेतकरी गटाच्या दालमिलचे तसेच लक्ष्मण भिमा आतराम या लाभार्थ्याने बांधलेल्या आदिम कोलाम आवास योजनेतील घरकुलाचे उद्घाटन करण्यात आले. प्रस्तावित ९९ लाख ६२ हजार रुपयांच्या क्रीडा संकुलाचे तसेच मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही राज्यपाल यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाला राज्यापालांचे सचिव बी. वेनुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजित कुमार, आमदार प्रदीप नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार आदि मान्यवर उपस्थित होते.