जवसापासून तयार होणार लिनेन; नागपूर जिल्ह्यात प्रयोग

0
13

नागपूर,दि.10 : जगातील अनेक देशात जवसाच्या कांड्यांपासून लिनेन कापडाची निर्मिती केली जाते. भारतातही हे प्रकल्प आहेत. मात्र, यासाठी ‘रॉ मटेरियल’ म्हणून लागणाऱ्या जवसाच्या कांड्यांची विदेशातून आयात करावी लागते. आता मात्र नागपुरातही जवसाच्या काड्यांपासून फायबर निर्मिती करण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हा प्रयोग पुढे यशस्वी ठरल्यास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
विदर्भ माझा पक्षाचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,कळमेश्वर तालुक्यातील उपरवाही येथे अंबिका चांडक यांनी जवसाच्या काड्यांपासून फायबर निर्मिती करण्याचे काम सुरू केले आहे. सुरत येथील वस्त्रोद्योग उद्योजकांशी चर्चा झाली आहे. ते लवकरच हा प्रायोगिक प्रकल्प पाहण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील चिखलापार, ता़ भिवापूर येथील प्रगतिशील शेतकरी डॉ़ नारायण लांबट हे नामशेष होत चाललेल्या जवस बियांचे संगोपन, मशागत व जवसाच्या उत्पादनांसाठी प्रयत्न करीत आहेत़ जवसापासून धागा निर्माण करण्याचे तंत्रज्ञानही आता विकसित केले जात आहे. १९६० सालापर्यंत विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे जवस बियांपासून तयार केलेल्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. हे तेल सेवन केल्यानंतर शरीरातील कोलेस्ट्रॉलच नाहिसे होतात. तसेच हे तेल आरोग्यासाठी लाभदायक आहे. परंतु, नंतर जवस तेलाची जागा शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तांदळापासून तयार होणाऱ्या तेलाने घेतली. विदर्भात सोयाबीन तेलाची निर्मिती होऊ लागल्याने जवस तेल दुर्लक्षित झाले.
जवसाला पर्याय म्हणून इंग्रजांनी कापूस आणला. कापसापासून कापड तयार होऊ लागला. त्यामुळे जवसापासून तयार होणारे लिनेन मागे पडले. विदर्भात जवस उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे. जवसापासून तेल, जनावरांसाठी खाद्य ढेप आणि दांड्यापासून लिनेन तयार होऊ शकतो. जवसाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतल्यास त्यांची आर्थिक स्थिती सुधारु शकते, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला युगांतर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. वामनराव कोंबाडे, बाबा कोंबाडे, नाना ठाकरे उपस्थित होते.