कोरेगाव भिमा हिंसा: अखेर पुणे पोलिसांकडून मिलिंद एकबोटेंना अटक

0
14

पुणे,दि.14(विशेष प्रतिनिधी)- कोरेगाव भिमा हिंसा प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटेंना अखेर पुणे पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. आज सकाळी सुप्रीम कोर्टाने एकबोटेंचा अर्ज फेटाळल्यामुळे त्यांचे सर्व मार्ग बंद झाले होते. अखेर आज हिंसा घडल्याच्या 72 दिवसांनी अटक झाली. मिलिंद एकबोटेंवर कोरेगाव भिमा येथे हिंसा भडकवल्याचा प्रमुख आरोप आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना सुप्रीम कोर्टाने 14 मार्चपर्यंत एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्याआधी मुंबई हायकोर्ट व पुणे सत्र न्यायालयाने एकबोटे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. नंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 20 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान एकबोटेंना 14 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आज त्यावर सुनावणी झाली. मात्र, आज कोर्टाने त्यांना जामीन देता येणार नाही असे स्पष्ट बजावले.

दरम्यान, पुणे पोलिसांनी मंगळवारीच सुप्रीम कोर्टात आपला अहवाल सादर केला. यात मिलिंद एकबोटे यांनी कोरेगाव भिमा प्रकरणात काही लोकांना कसे भडकवले याचे पुरावे सादर करण्यात आले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन नाकारला.20 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान एकबोटेंच्या वकिलाने सरकारला तोंडावर पाडले होते. मिलिंद एकबोटेंना अद्याप अटक का केली नाही असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला केला होता. यावर एकबोटे सापडले नाहीत, ते गायब झाले होते असे उत्तर राज्य सराकरच्या वकिलाने दिले होते. यावर एकबोटेंच्या वकिलाने सरकारचे दावे फेटाळून लावत, आम्ही सातत्याने सहकार्य करायला व पोलिसांत जायला तयार होतो, मात्र पोलिस अथवा प्रशासनाने आम्हाला बोलवले नाही असे सांगतिल्याने सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या अब्रूचे खोबरे झाले होते. यावर सुप्रीम कोर्टाने सरकारला या प्रकरणी पुन्हा तपास करा व गरज भासली तर एकबोटेंना अटक करा असे निर्देशच दिले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी एकबोटेंचा कोरेगाव भिमा प्रकरणी पूर्ण सहभाग असल्याचे पुरावे सुप्रीम कोर्चात सादर केले. आता एकबोटेंना अटक झाली आहे.