महाराष्ट्रातील सहाही खासदार राज्यसभेवर बिनविरोध

0
12

मुंबई.,दि.१५:- राज्यसभेसाठी भाजपच्या चौथ्या उमेदवार असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी माघारी घेतला. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे सहाही खासदार बिनविरोध निवडून गेले आहेत. भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे व व्ही. मुरलीधरन यांच्यासह शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि काँग्रेस उमेदवार कुमार केतकर हे यंदा राज्यसभेवर गेले आहेत.राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, भाजपच्या चौथ्या उमेदवार असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.राज्यसभेच्या निवडणुकीसाठी विधानसभेचे सदस्य मतदान करतात. यंदा सहा जागांसाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 42 मतांची गरज होती. मात्र, प्रत्येक पक्षाने आपापल्या विधानसभेतील संख्याबळानुसार उमेदवार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.