अठरा वर्षांपासून रखडली ओबीसींची जनगणना-प्रा.श्रावण देवरे

0
9

नाशिक दि.१६ः ओबीसींनी टिकविलेली संस्कृती, जडणघडण समाजातील सर्व घटकांना जोडून ठेवणारी आणि समतावादी अशी आहे. संपूर्ण देशभर विखुरलेला हा समाज देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी योगदान देत आहे. समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या एकजूट ठेवण्याचे काम या समाजाने केले. मात्र, वारंवार मागणी करूनही गेल्या अठरा वर्षांपासून अद्यापपर्यंत ओबीसींची जनगणना करण्यात आली नसल्याची खंत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक श्रावण देवरे यांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ओबीसींसाठी योगदान’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन होते. याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. नागार्जुन वाडेकर उपस्थित होते.
देवरे पुढे म्हणाले, देशातील विचारवंत आणि महापुरुषांनी समाजाच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केला आहे. समाजातील जातीव्यवस्थेत ज्या घटकांचे शोषण झाले, त्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करण्यात आली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ओबीसींच्या विकासासाठी कालेलकर आयोगाची स्थापनाही करण्यात आली होती. मात्र, दुर्दैवाने तो स्वीकारला गेला नाही. पुढे मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. परंतु ओबीसी घटकास त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे प्रतिनिधित्व मिळाल्याचे चित्र पहायला मिळत नाही. सन २०१० मध्ये ओबीसींची जनगणना करण्यासंदर्भात कायदा होऊनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ओबीसींच्या आर्थिक सर्वेक्षणाला २०१२ मध्ये सुरुवात करूनही आजपर्यंत ओबीसींची जनगणना झाली नसून ती तातडीने करण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. देवरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन म्हणाले, कुठल्याही रचनेत वा संस्थेत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळाले तर समाजाची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधली जाईल. प्रास्ताविक प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी केले. दयानंदन हत्तीअंबरे यांनी सूत्रसंचालन केले. कविता सोनवणे यांनी परिचय करून दिला. राहुल ढेरे यांनी आभार मानले.