३५० शेतकऱ्यांची राष्ट्रपतींकडे तर 9 चालक वाहकांची राज्यपालाकडे इच्छा मरणाची परवानगी

0
12

खामगाव/गडचिरोली,दि.21 : महामार्गात जमीन गेली..जवळ होता नव्हता तो पैसा संपला….सरकार मोबदला देण्यास टाळाटाळ करत असल्याने आता जगायचं कसं , असा प्रश्न पडलेल्या खामगाव तालुक्यातील ३५० शेतकऱ्यांनी राष्ट्रपतीकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी बस आगारातील 9 चालक वाहकांनी मिळणारे तुटपुंजे वेतन व भत्ते आणि नोकरीत नसलेले स्थायीत्व लक्षात घेत कुटुंब चालवू शकत नसल्याने आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.परंतु आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असल्याने आम्हाला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावे या आशयाचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यासह मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेत्यांना पाठविले आहे.

नागपूर मुंबई महामार्ग चौपदरीकरण कामात खामगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पिकावू, बागायती जमीन सरकारने घेतली, मात्र त्यांना अत्यल्प मोबदला दिला.शेतकऱ्यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही. नवीन कायदा लागू असतांना जुन्याच कायद्याने लवाद न नेमता जमीन अधिग्रहीत करण्यात आली. परिणामी शेतकऱ्यांना बाजारभावा पेक्षा कमी मोबदला मिळाला. हा मोबदला नवीन भुसंपादन कायद्याच्या नुसार देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी करत आहेत. त्यांनी त्यासाठी उपोषणाही केले. मात्र सरकार व प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. एक महिन्यापासून शेतकरी साखळी उपोषणाला बसले असले तरी त्यांच्या आंदोलनास सत्ताधारी व विरोधक यातील एकाही नेत्यांना भेट देण्यासाठी वेळ मिळाला नाही. उलट हे आंदोलन बंद करण्यासाठी संबधीत ठेकेदार धमक्या देत आहेत.