येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ नवे पासपोर्ट सेवा केंद्र- डॉ. ज्ञानेश्वर मुळे

0
19

नवी दिल्ली,दि.२९ : येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ नवे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास दिलेल्या भेटीदरम्यान दिली.देशातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने `पासपोर्ट आपल्या दारी` या तत्वानुसार पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रात ७ तर देशभरात १७३ पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली असून दुसऱ्या टप्प्याअखेर येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ केंद्रांसह देशभरात २५१ पासपोर्ट सेवा केंद्रांचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.
ही असणार नवीन १३ पासपोर्ट सेवा केंद्र
‘पासपोर्ट आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत राज्यात १३ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची संपूर्ण तयारी झाली असून येत्या दीड महिन्यात ही केंद्र सुरु होणार आहेत. ही केंद्र सिंधुदुर्ग, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सातारा, बीड, मुंबई नॉर्थ-सेंट्रल, मुंबई साऊथ- सेंट्रल, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड आणि जळगावचा समावेश आहे.
तिसऱ्या टप्प्यात राज्यात उर्वरित पासपोर्ट सेवा केंद्र
देशात दर ५० कि.मी. अंतरावर पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचे केंद्र शासनाचे उद्दीष्ट असून २०१८-१९ या वित्तीय वर्षात ‘पासपोर्ट तुमच्या दारी’ या कार्यक्रमाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये उर्वरित ठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मुळे यांनी दिली. पासपोर्ट विस्ताराच्या या कार्यक्रमामुळे देशातील सर्वसामान्य माणसाला पासपोर्ट मिळणे सहज शक्य होणार असल्याचा विश्वासही डॉ. मुळे यांनी व्यक्त केला.