भंडारा शहरासाठी ६९ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

0
13

भंडारा,दि.31 : बारमाही वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरात इंग्रजकालीन पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे शहरात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ६९ कोटी ५५ लाख ९२ हजार रूपयांची पाणी पुरवठा योजनेच्या प्रारूपाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. आता नगर परिषदेने प्रशासकीय मान्यतेसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे पुढच्यावर्षी शहरवासियांना नियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.भंडारा शहरातील पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार डॉ.परिणय फुके, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे ही योजना मंजूर होऊ शकली. आता लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. भंडारा शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असून प्रत्येक घरी पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत पाणी पुरवठा योजनेची क्षमता ९ एमएलटी इतकी आहे. बस आगारजवळ असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून हुतात्मा स्मारक व कारागृह परिसरातील दोन जलकुंभातून शहरात पाणी पुरवठा होत होता. परंतु आता प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेची क्षमता २५ एमएलटी राहणार असून नवीन पाईपलाईन टाकण्यात येईल. शहराचे सहा झोनमध्ये वर्गिकरण करून आणखी चार जलकुंभ बनविण्यात येणार आहेत. हुतात्मा स्मारक परिसरात ५.९० लाख लिटर, भय्याजी नगरात ७.५० लाख लिटर, एमएसईबी कॉलनीत ४.५ लाख लिटर आणि पटवारी भवन परिसरात १२.२० लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ बनविण्याची योजना असून ही योजना अडीच वर्षात पूर्ण होणार आहे.