मोदी यांच्याविरोधात काँग्रेसची शेतकरी पदयात्रा

0
3

नागपूर,दि.४ : २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी येथे ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. देशात भाजपाची सत्ता आल्यास शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांना सक्षम बनविणे, युवकांना रोजगार अशा विविध प्रकारची १९ आश्वासने दिली होती. परंतु गेल्या चार वर्षात यातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याने मोदी यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे ५ ते ८ एप्रिल दरम्यान पांढरकवडा ते दाभाडी अशी ९० किलोमीटरची शेतकरी पदयात्रा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रपरिषदेला काँग्रेसचे प्रदेश सचिव व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, गिरीश पांडव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुरेश कुमरे आदी उपस्थित होते.
चाय पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, कृषी व्याजदरात सवलत, कापसाला योग्य भाव व स्थानिकांना रोजगार, सोयाबीन शेती करणाऱ्यांना अधिक लाभ होईल, अशी व्यवस्था करणे, कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा, देशभरात गोदाम व कोल्ड स्टोअरेजचे जाळे निर्माण करणे, पीक विमा घेण्यासाठी तात्काळ कर्ज, नद्या जोड प्रकल्प राबविणे, आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मदत, देशात कृषी क्रांती आणली जाईल. गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पाला गेट लावून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ४०० कोटींची मोफत वीज देण्यात येईल, अशा प्रकारची आश्वासने दिली होती.
मोदी यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी भाजपाला मते दिली. परंतु सत्तारूढ होताच भाजपाला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. शेतकरीविरोधी धोरणामुळे यवतमाळ, चंद्रपूर व अदिलाबाद या तीन जिल्ह्यातील पाच लाख एकर शेतीला पाणी देण्याची क्षमता असलेला निम्न पैनगगां प्रकल्प २०१४ सालापासून बंद पडला आहे. याचा निषेध म्हणून ही पदयात्रा काढली जाणार आहे. पदयात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभांना माजी खासदार नाना पटोले, नरेश पुगलिया, आ. विजय वडेट्टीवार, खा. राजीव सातव, शेतकरी नेते खा. राजू शेट्टी, आ. नौशाद सोलंकी आदी मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवाजीराव मोघे यांनी दिली.