छत्तिसगडमध्ये माओवाद्यांचा पुन्हा हल्ला

0
9

रायपूर,दि.14(वृत्तसंस्था)- माओवाद्यांच्या घातपाती कृत्यांची झळ सतत बसणाऱ्या छत्तिसगडमध्ये एक नवी घटना समोर येत आहे. सुकमा जिल्ह्यातील सीआरपीएफची एक छावणी माओवाद्यांनी उडवून दिली आहे. ही छावणी काही महिन्यांपुर्वीच रिकामी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तिसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या दौऱ्याच्या केवळ काही तास आधी हा हल्ला झाल्याने त्याचे गांभिर्य अधिक असल्याचे मानले जाते.हे ठिकाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रम स्थळापासून म्हणजे जांगला प्रांतापासून केवळ 150 किमी अंतरावर आहे. आयईडीच्या साहाय्याने माओवाद्यांनी ही छावणी उडवून दिल्याची माहिती समोर  येत आहे.
सीआरपीएफचे दिल्लीमधील प्रवक्ते दिनकरन मोजेस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफने ही छावणी सहा महिन्यांपुर्वी रिक्त केली होती. ती उडवण्यासाठी माओवाद्यांनी आयईडीचा वापर केला आहे. सुकमामधील बोरगुडा येथे ही घटना पहाटे 1.30 च्या सुमारास झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये सीआरपीएफने ही छावणी सोडून तिचा ताबा जिल्हा प्रशासनाकडे दिला होता. त्यानंतर सीआरपीएफने आपला तळ जिल्ह्यात इतरत्र हलवला होता. तसेच याच दिवशी माओवाद्यांनी धर्मपेंटा आणि पेद्गुदाम रस्त्याच्या बांधाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एका ट्रकलाही आग लावलेली आहे.
याच आठवड्याच्या सुरुवातीला माओवाद्यांनी आयईडीच्या मदतीने बिजापूर जिल्ह्यात एका बसला उडवले होते. या बसमध्ये डीआरजीचे जवान होते. या हल्ल्यामध्ये दोन जडवानांचा मृत्यू झाला तर चार जवान जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिजापूर भेटीचा माओवाद्यांनी विरोध केला असून लोकांनी त्यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहू नये यासाठी प्रयत्नही केले आहेत. बिजापूर जिल्ह्यातील काही खेड्यांमध्ये ‘ मोदी परत जा’ असे लिहिलेली पत्रके सापडली आहेत.