राज्यातील 25 वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या,सौरभ राव पुण्याचे महापालिका आयुक्त

0
19

माधवी खोड़े महिला बालकल्याण आयुक्तपदी

गोंदिया,दि.16:राज्यातील 25 वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी तर वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बदली डहाणूच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आचल गोयल यांची रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चेन्ने यांच्याकडे परिवहन आयुक्त आणि निवडणूक आयोगाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. महिला आणि बालकल्याण आयुक्त डॉ. एस. एल. माळी यांची नांदेड महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे तर अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त, नागपूर माधवी खोडे-चावरे यांची महिला आणि बालकल्याण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती यांची महाव्यवस्थापक, खाण महामंडळ नागपूर पदी बदली झाली आहे. तर एमएमआरडीएचे डॉ. संजय यादव यांच्यावर अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा भार सोपवला आहे.बुलडाण्याचे जिल्हाधिकारी सीएल पुलकुंडवार यांची सहसंचालकीय व्यवस्थापक, एमएसआरडीसी पदी बदली करण्यात आली आहे तर खाण महामंडळ नागपूरच्या महाव्यवस्थापक निरुपमा डांगे या आत्ता बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी असतील पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. तसेच गणपत देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

जालना-जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची मुंबई शहरचे जिल्हाधिकारी म्हणून राज्यशासनाने बदली केली आहे. त्यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झाली नाही.जोंधळे यांनी जवळपास दोन वर्षांपूर्वी जालना जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. पीकविमा भरण्याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. याचा परिणाम म्हणून पीकविमा योजनेत राष्टीय पातळीवर जालना जिल्हा प्रथम आला. या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जोंधळे यांना गौरविण्यात आले होते. ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्ग, शेगाव-पंढरपूर पालखी मार्ग आदी प्रकल्पांसाठीच्या भूसंपादनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

औरंगाबाद : जिल्हा परिषद सीईओ मधुकरराजे आर्दड यांची आज अहमदनगर मनपा आयुक्तपदी बदली करण्यात आली. जव्हार येथील आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत परवीन कौर या सीईओ म्हणून त्यांची जागा घेतील.जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आली असून ते उद्या पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.