कँडल मार्च काढत बलात्काराच्या घटनेचा नोंदविला निषेध

0
13

गोंदिया, दि.१६:- गोंदिया शहरातील सर्व सामाजिक संघटना,सर्व राजकीय पक्ष,बहुजन युवा मंच आदीच्या नेतृत्वात आज सोमवारला जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरण आणि यूपीतील उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ कॅंडल मार्च काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.देशामध्ये महिलांवर होणाऱ्या, वाढत्या अत्याचाराचा विरोध करीत  कँडल मार्च काढत बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदविला.येथील मामा चौक, इंगळे चौक,नेहरु चौक,गोरेलाल चौक, गांधी चौक,जयस्तंभ चौक ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक असा कॅंडल मार्च निघाला.  या मार्च मध्येत शहरातील तरुणाई,महिला तसेच जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. घोषणाबाजी करत दोन्ही घटनांचा निषेध करण्यात आला. कठुआ बलात्कार प्रकरणातील चिमुरडी आसिफाला न्याय मिळावा आणि उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली,तसेच मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात घटनेचा निषेध नोंदवित मृत मुलीला श्रध्दांजली वाहण्यात आली.

उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरण काय आहे?

भाजपचे उन्नावमधील आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या भावाने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला. खटला मागे न घेतल्यामुळे 3 एप्रिल रोजी आमदाराच्या भावाने पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेले वडील सुरेंद्र सिंह यांच्यावरच गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना तुरुंगात पाठवले. मात्र जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी सुरेंद्र सिंह यांना मृत घोषित केले. आमदाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला. आमदाराच्या दबावामुळे वर्षभरापासून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. न्याय न मिळाल्यामुळे रविवारी पीडितेचे कुटुंब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहन करण्यासाठी गेले. त्यानंतर बलात्कार पीडितेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयने अटक केली.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार, हत्या प्रकरण

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 10 जानेवारीला पिडीत बालिका खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचे एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केले आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवले. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर पिडीतेची हत्या केली. शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला पिडीतेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. 17 जानेवारीला जंगलात पिडीतेचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजीराम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याचा मुलगा विशालला अटक करण्यात आली. संजीरामला मदत करणे आणि अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.