शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या सरकारला पाईपलाईनमध्ये टाका:नाना पटोले

0
10

गडचिरोली, दि.१६: ३४ हजार कोटीची कर्जमाफी केल्याचे सांगणाऱ्या सरकारकडे कर्जमाफीची माहितीच उपलब्ध नाही. सरकारने सरसकट कर्जमाफी तर केलीच नाही; उलट ६७ वेळा धोरण बदलून शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रचंड त्रास दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना लाईनीत उभे करणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकीत पाईपलाईनमध्ये टाका, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

नाना पटोले यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, मजूर व बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.या मोर्चात युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रतिभा रघुवंशी, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर, पक्ष निरीक्षक सुरेश भोयर, प्रफुल्ल गुडधे पाटील, जिया पटेल, रवींद्र दरेकर, हसनअली गिलानी, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, नरेंद्र जिचकार, डॉ.नामदेव किरसान, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रा.राजेश कांबळे, नितीन कुंभलकर, श्री.सेठिये आदी मान्यवर सहभागी झाले होते. दुपारी १ वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. नाना पटोले व अन्य नेत्यांनी बैलगाडीवर उभे राहून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथे जाहीर सभा झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु नोटाबंदीनंतर प्रत्यक्षात एकट्या महाराष्ट्रात ७ हजार उद्योग बंद पडले. शिवाय वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदांची नोकरभरती बंद केली. यामुळे बेरोजगार हताश आहे. महागाई वाढली आहे. शेतमालाला भाव नाही. धान, सोयाबीनचे भाव पडले आहेत. त्यामुळे अशा सरकारला जागा दाखवून द्या, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी म्हणाले की, हे सरकार कमिशनखोर सरकार आहे. बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, स्मार्ट सिटी अशा शेतकरी आणि सामान्य जनतेला नको असलेल्या गोष्टींमध्ये सरकारचा रस आहे. देशात दररोज महिला आणि मुलींवर बलात्कार होत आहेत, त्याचा भाजप नेते आत्मक्लेश करीत नाही. मात्र, लोकांच्या प्रश्नासाठी सरकारला धारेवर धरल्याबद्दल हे लोक उपोषण करतात. त्यामुळे हे खोटारड्या लोकांचे सरकार आहे, अशी टीका डॉ.उसेंडी यांनी केली. एकीकडे नोकरभरती नाही. तेंदू व्यवसायातून गोरगरिबांना रोजगार मिळतो. परंतु सरकारने तेंदूवरही जीएसटी लावल्याने कंत्राटदारांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. यावरुन गोरगरिबांचा रोजगार हिसकावण्याचे काम सरकार करीत आहे. शिवाय शाळा बंद करुन शिक्षणाची दारे बंद करण्याचा विडा सरकारने उचलला आहे, असा आरोप डॉ.उसेंडी यांनी केला.प्रास्ताविकात महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्ह्याच्या समस्यांबाबत माहिती देऊन सरकारवर टीका केली. सभेचे संचालन हसनअली गिलानी यांनी केले. सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.