महसूल कर्मचाऱ्यांचे कावलदरा येथे महाश्रमदान

0
16

उस्मानाबाद, दि. 21:- सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून उस्मानाबाद तालुक्यात सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत आता उस्मानाबाद तालुक्यातील महसूलच्या विविध विभागांतील शासकीय अधिकारी व कर्मचारीही उतरले असून ग्रामस्थांच्या बरोबरीने त्यांनीही हातात कुदळ, फावडे घेऊन श्रमदान केले.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसिलदार सुजित नरहरे, राहूल पाटील, अभय मस्के, राजकुमार माने, नायब तहसिलदार एन. बी. जाधव, संतोष पाटील, प्रियंका लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्यातील कावलदरा येथे शनिवारी महाश्रमदान घेण्यात आले. पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सुमारे 92 गावांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. यापैकी कावलदरा तांडा येथील डोंगर माथा ते पायथ्यावर दि. 21 एप्रिल रोजी महसूल विभागाच्या विविध विभागांनी ग्रामस्थांसमवेत महाश्रमदान करण्याचे नियोजन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे व तहसीलदार सुजित नरहरे, राहूल पाटील तसेच पाणी फाउंडेशनचे उस्मानाबाद समन्वयक उमेश मडके, विलास येवले, अशोक कदम व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
उस्मानाबादच्या महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्व तलाठी व कर्मचारी ग्रामस्थांसमवेत सकाळपासून श्रमदानाचे चांगले काम केले आहे, पुढील काळातही ग्रामस्थांसमवेत एकत्र येऊन जिल्हयातील जास्तीत-जास्त गावात विविध शासकीय विभागांच्या वतीने श्रमदानाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी यावेळी प्रतिपादन केले.
कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले यांच्यासह या विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही श्रमदानात भाग घेतला होता. कावलदरा येथे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह सुमारे हजारांवर श्रमदात्यांनी डोंगरमाथा ते पायथा पाणीदार करण्यासाठी श्रमदान करून सहभाग नोंदवला. यामध्ये लहान-मोठे सलग समतल चर, दगडी बांध आदी कामे करण्यात आली.
रविवार दि. 21 एप्रिल रोजी तालुक्यातील खेड गावात पंचायत समिती उस्मानाबाद चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. खेड येथील ग्रामस्थ, त्यांचे नातेवाईकांना, मित्र परिवारास या महाश्रमदानात सहभागी करून घ्यावे. यातून जलसंधारणाचे मोठे काम उभे राहणार आहेच, शिवाय मनसंधारणातून गावाच्या विकासालाही चालना मिळेल, असे आवाहन प्रांताधिकारी जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी केले आहे.
कालवदरा तांडा येथील डोंगर माथा ते पायथा महाश्रमदानाच्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी, गावचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनीही श्रमदान केले.