शेतकऱ्यांनी मान्यता प्राप्तच कापूस बियाणे खरेदी करावेत

0
21

नांदेड, दि. 21:- गत वर्षीच्या खरीप हंगामात यवतमाळसह राज्यात मोठया प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामागील कारणांचा वेध घेतेवेळी एच.टी. बी.टी. कापूस बियाण्यांची अवैधरित्या मोठया क्षेत्रावर लागवड झाल्याची बाब समोर आली होती. आंध्राप्रदेश, तेलंगाना तसेच गुजरात राज्यातून या बियाण्याचा पुरवठा झाल्याचेही उघडकीस आले होते. या पार्श्वभुमिवर हंगामात एच.टी. बियाणे अवैधरित्या शेतकऱ्यापर्यंत पोहचणार नाही, या करीता कृषि विभागामार्फत जिल्हा स्तरावर 01 व तालुका स्तरावर 16 असे एकूण 17 भरारी पथकांची स्थापना केली आहे. क्षेत्रिय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जागृती अभियान राबविले जात आहे. तसेच शेतकऱ्यांनी अवैध व पर्यावरण विरोधी एच.टी. बी.टी. कापूस बियाणे खरेदी करु नये व लागवड करु नये. जर एच.टी. बी.टी. कापूस बियाण्यांची विक्री, साठवणूक, बुकींग बाबत माहिती प्राप्त झाल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ तसे कृषि विभागातील अधिकाऱ्यांशी व पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
खरीप हंगाम 2018 मध्ये बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी खरेदी करतांना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी :- गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. बनावट/भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्या पावतीसह खरेदी करा. पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन पिक निघेपर्यंत पावती संभाळून ठेवा. खरेदी केलेल्या बियाणेचे वेष्टन /पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पॉकिटे सिलबंद/ मोहोरबंद असल्याची खात्री करा. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतीम मुद्दत पाहून घ्या. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. किटकनाशके अंतीम मुदतीचे आतील असल्याची खात्री करा. आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष/ दुरध्वनी/ ई-मेल/ एस.एम.एस./ इत्यादी द्वारे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हा. कृषि निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी/ तक्रारी सोडविण्यासाठी/ मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा. विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोन नंबर दिलेले आहेत व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड कार्यालय फोन नंबर 02462-284252 व कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड कार्यालय फोन नं. 02462-234767 या क्रमांकावर संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये व संभाव्य नुकसान टाळण्याकीरता मान्यता प्राप्तच कापूस बियाणे खरेदी करावे असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे सभापती कृषि व पशुसंवर्धन समिती रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण रेड्डी यांनी केले आहे.