नक्षलवाद्यांना पुन्हा एक हादरा;दुसऱ्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार

0
13

गडचिरोली,दि.24ः जिल्ह्यात ४८ तासांत झालेल्या दुसऱ्या चकमकीत सोमवारच्या सायकांळी सहा नक्षल्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मृतकांमध्ये जहाल नक्षली आणि नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य नंदूचा समावेश असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. अहेरी तालुक्यातील राजाराम खांजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पत्तीगावच्या जंगलात सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही चकमक झाली.

पत्तीगावच्या जंगलात कसनसूर-बोरियाच्या चकमकीतून बचावलेले काही माओवादी असल्याची माहिती अतिरीक्त पोलिस अधीक्षक राजा आणि हरी बालाजी यांना मिळाली होती. तातडीने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सी-६० कमांडोचे पथक या भागात पोहचले. शोध मोहीम राबवित असतानाच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनीही प्रत्युत्तर दिल्याने चकमक उडाली. गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळाचा शोध घेण्यात आला असता सहा नक्षल्यांचे मृतदेह सापडले. रात्री उशिरा या नक्षल्यांचे मृतदेह अहेरीच्या प्राणहिता मुख्यालयात आणण्यात आले. बोरियाच्या जंगलातील चकमकीनंतर नक्षलवादी बॅकफूटवर गेल्याची चर्चा होत असतानाच पुन्हा सहा ठार झाल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सोमवारी बोरियाच्या जंगलातील चकमकीत ठार झालेल्या १६पैकी १२माओवाद्यांची ओळख पटविण्यात आली. इतर चार माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.