महाराष्ट्राला राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्कार

0
8

महाराष्ट्रातील १८ पंचायत संस्थाना पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

नवी दिल्ली दि.२४: ग्रामपंचायतीनां सशक्त करण्यासाठी आधूनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्काराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज हा पुरस्कार मध्य प्रदेशातील मंडला येथे आयोजित पंचायतराज दिन कार्यक्रमात स्वीकारला. महाराष्ट्रातील १५ ग्रामपंचायती २ तालूका पंचायत समिती व सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेस यावेळी प्रधानमत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आज मध्य प्रदेशातील मंडला येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पंचायतराज दिनानिमित्त दिन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार व नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पंचायतराज मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला आदि उपस्थित होते.

ग्रामविकास विभागास राष्ट्रीय ई ह्नपंचायत पुरस्कार
महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायतींना सशक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने डिजीटल इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत हा पुरस्कार देण्यात आला. या श्रेणीतील पहिला पुरस्कार सिक्कीम या राज्यास तर दुसरा पुरस्कार ओरिसा राज्यास मिळाला आहे.

सिंधूदूर्ग जिल्हा परिषदेस पुरस्कार
सिंधूदूर्ग जिल्हा परिषदेस दिन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर भंडारा तालुका पंचायत व गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव या तालुका पंचायत समितींनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १४ ग्रामपंचायतींना दिन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जांभळी, अहमदनगर जिल्ह्यातील गनेगाव व एकरुखे, सांगली जिल्ह्यातील सामडोली व कामेरी, चंद्रपूर जिल्ह्यातील अवळगाव व बाबराळा, सातारा जिल्ह्यातील मेतगुताड व शिवथर, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊत्तूर, नंदूरबार जिल्ह्यातील बोकळझर, सिंधूदूर्ग जिल्हातील कोळोशी, वर्धा जिल्ह्यातील बारबाडी व भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ऊत्तूर ग्रामपंचायतीला ग्राम सभा पुरस्कार
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यातील ऊत्तूर ग्रामपंचायतीस नानाजी देशमुख गौरव ग्रामसभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.