राज्यातील सर्व कृषिपंपांना 2025 पर्यंत सौरऊर्जा – चंद्रशेखर बावनकुळे

0
9

मुंबई,दि.29 – येत्या 2025 पर्यंत राज्यातील सुमारे 45 लाख कृषिपंपांना टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे कृषिपंपांना दिवसा तसेच पुरेशी व स्वस्त वीज मिळावी, ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी पूर्ण होईल, सोबतच क्रॉस सबसिडी कमी झाल्याने प्रामुख्याने औद्योगिक व वाणिज्यिक वीजदरसुद्धा कमी होतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.ते म्हणाले, कृषिपंपांसोबतच राज्यातील नळयोजना व उपसा जलसिंचन योजना संपूर्णपणे सौरऊर्जेवर आणण्याची अंमलबजावणी सुरू आहे. गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे 7.5 एचपीपर्यंतचे पंप लवकरच सौरपंपांनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. राज्यात 14 हजार 400 मेगावॉटचे अपांरपरिक ऊर्जानिर्मिती करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. येत्या डिसेंबर 2019 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या संस्थांनी सौरऊर्जा प्रकल्प उभारावेत. ही वीज शासन खरेदी करेल. सोबतच केंद्र सरकारच्या “एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ कंपनीसोबत (ईईएसएल) 200 मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचे करार झाले आहेत. ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापन क्षेत्रात सहभागी स्पर्धकांनी आजपर्यंत सुमारे 3928 कोटी रुपयांचे ऊर्जाबचत साध्य केली आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.