स्मार्ट जिल्हा म्हणून नागपूरची राज्यात नवी ओळख – चंद्रशेखर बावनकुळे

0
10

नागपूर दि.१:: शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देताना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण व रोजगार व आरोग्य आदी मुलभूत सुविधा निर्माण करुन नागपूर शहर व जिल्हा राज्यात विकासाच्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून स्मार्ट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त कस्तुरचंद पार्क येथे मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार डॉ.मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, स्वातंत्र्य सैनिक, न्यायाधिश, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परेडचे निरक्षण केले. यावेळी पोलीस दलांतर्फे परेड कमांडर परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक विशाल ढोने यांनी मानवंदना दिली.
कृषी क्षेत्राबाबत पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, पायाभूत सुविधांसोबत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा देण्यासाठी राज्यात महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून देशातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना अत्यंत पारदर्शकतेने आणि गतिमानतेने राबविली आहे. या योजनेचा लाभ नागपूर जिल्ह्यातील 47 हजार शेतकऱ्यांना झाला असून 350 कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. या योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतीपंपाला विद्युत जोडणीसाठी उच्चदाब वितरण वाहिनी उभारण्यासह स्वतंत्र फीडर, सौर कृषीपंप आणि सौर रोहित्र योजना राबविण्यात येत आहे. मागेल त्याला शेततळेयोजनेअंतर्गत शेततळ्यांसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सिंचन क्षेत्रातील प्रगतीबाबत पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून नागपूर जिल्ह्यात 220 गावात 3 हजारपेक्षा जास्त कामे पूर्ण झाली असून यावर्षी 170 गावात मोठ्या प्रमाणात कामांना सुरुवात झाली आहे. विभागातील माजी मालगुजारी तलावांचे पुनर्जीवन करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत असून याअंतर्गत 214 मालगुजारी तलावांचे पुनर्जीवन करुन शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ देण्यात येत आहे. बळीराजा जलसंजिवनी योजनेच्या माध्यमातून राज्यातील 104 सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षात धडक मोहिम आखून पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पेंच नदीवर मध्यप्रदेशात चौराई धरणाच्या बांधकामामुळे महाराष्ट्रच्या वाट्याला येणाऱ्या पाण्याचे नुकसान भरुन काढण्यासाठी उपाययोजना प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
नागपूर शहर स्मार्ट करण्यासंदर्भात पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत नागपूर शहराची निवड झाली असून 1002 कोटीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी केंद्र शासनाकडून 190 कोटी, राज्य शासनाकडून 143 कोटी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेकडून 50 कोटी असा 383 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. संपूर्ण शहरातसीसीटीव्ही कॅमेरे, कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटर, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन असे सहा प्रकल्पही प्रस्तावित आहेत. नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. नागपूर मेट्रोचे काम वेगाने सुरु असून नागपूर मेट्रो निर्धारित वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागपूर शहर देशात उत्कृष्ट असून कचऱ्यापासून वीज निर्मितीवर भर देण्यात येत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी वीज निर्मिती केंद्रांना देण्यात येत आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आल्यामुळे नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यासह विविध कामांना सुरुवात झाली आहे. नागपूर शहराची जगातील सर्वात सुंदर शहर म्हणून गणना होत आहे. सर्वांसाठी घरे हे स्वप्न साकारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधणीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शहराप्रमाणे ग्रामीण भागातही राबविण्यात येत आहे.
उद्योग क्षेत्राबाबत पालकमंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, मिहान प्रकल्पाला गती देण्यात येत असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील नामांकित संस्थांनी आपले उद्योग सुरु केले आहे. त्यामुळे नागपूर शहर व विदर्भातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासोबत एरोस्पेस पार्कच्या माध्यमातून नागपूर जगाच्या नकाशावर येणार आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान योजनेअंतर्गत शहिद जवानांच्या वीर पत्नीस राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आजीवन मोफत प्रवास सवलत योजनेचे स्मार्ट कार्ड श्रीमती अनुराधा एस.देव, श्रीमती प्रीतम हरबंस कौर, श्रीमती स्मिता शशीकांत जुनघरे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार सुनील सिताराम मोवाडे भिवापुर तहसिल यांना रोख 5 हजार व प्रशस्तीपत्र देण्यात आले, भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाच्यावतीने मिठी मनोज राठी, गार्गी राहूल कुलकर्णी, निधी विजय भोयर, श्रावणी लक्ष्मीकांत पाटील यांना राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णबाण पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.