भाजप-राष्ट्रवादीने नाना पटोलेंचे राजकारण संपविले

0
23

नागपूर,दि.11 :भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेटिंग झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या या खेळीने नाना पटोले यांचे राजकारण संपविले आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.शुक्रवारी पत्रपरिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले, राज्याच्या दृिष्टकोनातून भंडारा-गोंदिया हा महत्त्वाचा मतदार संघ आहे. नाना पटोले यांनी भाजप सोडले तेव्हा त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका, यामुळे जॉर्इंट किलर म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली होती. तेव्हा या लोकसभेच्या मतदारसंघात पटोले हेच निवडणूक लढवतील, असे वाटले होते. म्हणून आम्हीही त्यांना समर्थन जाहीर केले होते. मात्र, राष्ट्रवादीकडे ही जागा गेली आणि त्यांनी जाणूनबुजून या ठिकाणी कमजोर उमेदवार दिला असल्याचे ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादीने या ठिकाणी कमकुवत उमेदवार का दिला, त्याचे कारण जाहीर करण्याचे आवाहनही आंबेडकर यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे साटेलोटे जगजाहीर आहे, म्हणून नाना पटोले यांची उमेदवारी नाकारली गेली. त्यानंतर राष्ट्रवादीने ही तिकडे कमजोर उमेदवार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या या वाटाघाटीतून भाजपची सीट निघावी हाच प्रयत्न असल्याचे दिसत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. तसेच या खेळीला काँग्रेस मात्र कशी बळी पडली असा सवालही त्यांनी केला.पत्रपरिषदेत भारिपचे भंडाऱ्यातील उमेदवार एल.के. मडावी, ज्येष्ठ नेते राजू लोखंडे उपस्थित होते.
२०१९ मध्ये सत्तेत आल्यास संविधान बदलू असा भाजपचा अजेंडा आहे. मात्र, भाजपचा हा अजेंडा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीमुळे भंडारा-गोेदिया लोकसभा पोटनिवडणूक भाजपासाठी एकतर्फी करण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. भाजपाला वॉकओवर मिळू देणार नाही. त्यामुळेच आम्ही आमचा उमेदवार जाहीर केला आहे.