बारावीच्या परीक्षापद्धती आमूलाग्र बदल

0
8

गडचिरोली,दि.17 – जेईई, नीट या परीक्षा देण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी खुशखबर आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांना सहज सामोरे जाता यावे, या उद्देशाने बारावीच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व पाठांचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण प्रश्नपत्रिकेत सर्व पाठांवरील प्रश्न येणार आहेत. तसेच याला कोणतेही पर्यायी प्रश्न नसतील. यामुळे जेईई आणि नीट परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे होणार आहे.

येत्या काळात इंजिनीअरिंग आणि मेडिकल शिक्षणासाठी देशभरात एकच सामायिक प्रवेश परीक्षा ठेवली जाणार आहे. इंजिनीअरिंगसाठी राज्यात स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असली, तरी वैद्यकीय शिक्षणासाठी देशपातळीवर ‘नीट’ ही परीक्षाच घेतली जाते. मात्र, राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांना सामोरे जाता येईल, असा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती आपल्याकडे नसल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय परीक्षा अवघड जातात, असा अनुभव आहे. त्या परीक्षा देणे सोपे जावे, या उद्देशाने सरकारने मागील वर्षीपासून अकारावीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आहे. आता या वर्षीपासून तो बारावीच्या परीक्षा पद्धतीसाठी लागू होणार आहे. फेब्रुवारी २०१९मध्ये, म्हणजेच यावर्षी बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना नवी परीक्षा पद्धती लागू होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सर्व पाठांचा अभ्यास करावा लागणार आहे. सध्याचा बारावीचा अभ्यासक्रम हा राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमाशी मिळता जुळता असल्यामुळे बारावीच्या पाठ्यपुस्तकाचा पूर्ण अभ्यास केल्यावर स्पर्धा परीक्षांचीही तयारी होऊ शकणार आहे. परीक्षा पद्धतीतही राष्ट्रीय परीक्षांप्रमाणे बदल करण्यात आले असून थेट प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडणारे प्रश्न यात विचारले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला आणि विचारालाही यात वाव मिळणार आहे.

बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना नीट आणि जेईई परीक्षा द्यायची नाही, अशांचा विचार करून परीक्षेसाठी पर्यायी प्रश्न नसलेली आणि असलेली अशा दोन प्रश्नपत्रिकांचा पर्याय विद्यार्थ्यांना देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. याबाबत शिक्षणतज्ज्ञांची मते विचारात घेतली जाणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ आणि ‘जेईई’ या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा द्यायच्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पर्याय नसलेली प्रश्नपत्रिका सोडवावी व ज्या विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षा द्यायच्या नाहीत, त्यांनी पर्याय असलेली प्रश्नपत्रिका सोडवावी, असे हे पर्याय देण्याचा विचार आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.