ठाणेदारांच्या मारहाणीने गंभीर जखमी युवकाचा अखेर मृत्यू

0
5

पुसद,दि.18 :- येथील आंबेडकर वाॅर्डात राहणाऱ्या युवकास चौकशीच्या नावाखाली पुसद शहर पोलिस स्टेशनमध्ये आणून ठाणेदार अनिलसिंग गौतम यांनी अमानुषपणे मारहाण करून जखमी केल्याची तक्रार युवकाच्या नातेवाइकाने थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती. या प्रकरणी दिलेल्या तक्रारींची दखल घेतली नसल्याने अखेर विविध सामाजिक संघटनांनी आता पुढाकार घेऊन उपोषण थाटण्याचे ठरविले असून हाटे कुटुंबीय सध्या उपोषण करीत होते. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना निवेदन देऊन कार्यवाही व न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. मात्र सांगवी मेघे येथे दि. १७ मे रोजी उपचारादरम्यान भीमाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.भीमा हाटे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दि. २९ एप्रिल २०१८ रोजी एका मुलीने तुकाराम मारोती हाटे यांचा मुलगा भीमा यांचे विरूध्द तक्रार दिली होती. त्या तक्रारीवर पुसद शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिलसिंग गौतम यांनी भीमा हाटेला त्याच्या राहत्या घरांतून उचलून चौकशीसाठी पोलिस स्टेशनला आणले. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली भीमाला बेदम मारहाण करून जखमी केले होते. या मारहाणी दरम्यान पोटाला सुद्धा दुखापत झाली व किडणीलाही जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. जखमी भीमाला एका दवाखान्यात उपचार सुरू होते. दरम्यानच्या काळात भीमाला जामीन देखील मंजूर झाला होता. उपचारा दरम्यान प्रकृती साथ देत नसल्याने त्याची प्रकृती अधिकच खालावली होती. भीमाला अधिक उपचारासाठी सांगवी मेघे येथील रूग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी मारहाणीमुळे त्याच्या पोटातील आतडे व किडणीला गंभीर दुखापत झाल्याने प्रकृती नाजूक मात्र स्थिर असल्याचे सांगितले होते. मात्र त्याचा उपचारा दरम्यान दि. १७ मे २०१८ राजी दुपारी भीमाने अखेरचा श्वास घेतला.

पुसद शहर पोलिस स्टेशनला नव्याने रूजू झालेले वादग्रस्त ठाणेदार गौतम हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या प्रकरणाच्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. ठाणेदार गौतम यांच्या मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या केली होती. एवढेच नव्हे तर पोलिस स्टेशनमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारीचा निपटारा ते स्वतःच करीत गुन्हेगाराला व तक्रारकर्त्याला बगलमध्ये ठेवित असल्याचेही बोलल्या जात आहे. यामुळेपुसदमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी आता सर्व सामान्याकडून जोर धरत आहे.