वैनगंगा नदीत बूडून दोन युवकांचा मृत्यू

0
9

देसाईगंज,दि.१९- वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा पाण्याची पातळी न समजल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज १९ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
विक्की चंदन चौधरी (१७) रा. तुकूम वॉर्ड, निलेश प्रफुल बिलेकर (१७) रा. कन्नमवार वॉर्ड देसाईगंज अशी मृतक युवकांची नावे आहेत. दोन्ही युवक स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालयात १२ वीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत होते.

प्राप्त माहितीनुसार स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालयात इयत्ता १२ वीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेले  विक्की चंदन चौधरी व नीलेश प्रफुल बिजलेकर हे दोघे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीच्या विर्शी घाटावर आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान आंघोळ करीत असताना ते खोल पाण्यात गेले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा डोहात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेत पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रूग्णालयात पाठविले. अधिक तपास पोलिस निरीक्षक सिद्धानंद मांडवकर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक सारिका गुरुकर करीत आहेत.