बावनथडी संघर्ष समितीची तहसील कार्यालयावर धडक

0
8

तुमसर,दि.२०ः : तुमसर तालुक्यातील १५ गावाला शेतीकरीता सिंचनाची सुविधा नाही तथा पाणीपुरवठ्याची सोईसुविधा अपूर्ण आहेत. सदर समस्येकरिता १५ गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी शनिवारी तहसील कार्यालयात धडक दिली. मागील २० वर्षापासून समस्या जैसे थेच आहेत. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांसह महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय बावनथडी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला.
गोबरवाही परिसरातील १२ व आलेसुर, गोंडीटोला व विटपूर या आदिवासी बहुल गावांना मागील १२ वर्षापासून बावनथडी प्रकल्पातून शेतीकरिता सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. पाणीपुरवठा योजना जरी पूर्णत्वास आल्याचा दावा करण्यात आला. परंतु ग्रामस्थांना अजुनपर्यंत पाणीपुरवठा सुरू झाला नाही. मागील अनेक वर्षापासून शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या सुटल्या नाही. तांत्रिक कारणे पुढे करून प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोप बावनथडी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लावला.
तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्प आहे. प्रकल्पापासून १५ गावे तीन ते दहा कि़मी. अंतरावर आहेत. ही गावे उंच भागी असल्याने या गावांना शेतीकरिता पाणी मिळत नाही. स्थापत्य अभियंत्यांनी तशी माहिती दिली. शेती सिंचनाकरिता उपसा सिंचन योजना हे एकमेव पर्याय असल्याचे यावेळी बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांनी बैठकीत सांगितले. सदर गावांना प्रवाही सिंचनाची सोय होण्याकरिता मोठी तांत्रिक अडचण आहे. उपसा सिंचन योजना पवनारखारी येथे तयार व्हावी याकरिता शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आले. बावनथडी संघर्ष समिती पदाधिकारी व अधिकाऱ्यांत चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे येणाºया लोकसभा व इतर सर्व निवडणुकीवर बहिष्कार घातल्याचा निर्णय संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी घेतला.
बैठकीला उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.के. गेडाम, पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता ए.जी. जिभकाटे, नायब तहसीलदार निलेश गोंड, बावनथडी संघर्ष समितीचे आनंद जायस्वाल, पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण गाढवे, दर्शन माधवानी, शरद खोब्रागडे, देवेंद्र अवथरे, अनिल टेकामसह पदाधिकारी उपस्थित होते.