मोदींनी केली शेतकऱ्यांची दिशाभूल-खा.राजू शेट्टी

0
14

साकोली,दि.24 : मागील लोकसभा पोटनिवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली. सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची अवस्था दयनीय केली. कोणत्याही शेतमालाला भाव नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळवूनही शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. याला मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केला.
स्थानिक होमगार्ड परेड ग्राऊंडवर शेतकरी संघटनेच्या एल्गार सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर शेतकरी संघटनेचे नेते चंद्रकांत वानखडे, गजानन अहमदाबादकर, उत्तमराव पोपळे, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, अ‍ॅड.जांभुळे, सुशिला मोराडे, माजी आमदार सेवक वाघाये, सदाशिव वलथरे, अविनाश ब्राम्हणकर, मदन रामटेके, जि.प. सदस्य होमराज कापगते, अशोक कापगते, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, देवानंद पवार, विनोद पटोले उपस्थित होते.
यावेळी खा.शेट्टी म्हणाले, मोदींनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्तेवर आले आणि शेतकºयांसह सर्वसामान्यांची पिळवणूक करीत आहेत. नोटबंदी करून लोकांना रांगेत उभे केले. निरव मोदी व विजय माल्ल्यासारख्या कर्ज बुडव्यांवर कारवाई केली नाही. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.
पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मागीलवर्षी पाकीस्तानातून कांदा आयात केला व यावर्षी साखर. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना संपविण्याचे काम मोदी सरकार करीत असल्याची टिकाही त्यांनी केली. प्रास्ताविक प्रशांत पवार यांनी केले.
संचालन जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते यांनी तर आभारप्रदर्शन शेतकरी संघटनेचे अंतराम खोटेले यांनी केले. कार्यक्रमाला हेमकृष्ण वाडीभस्मे, उमेश भुरे, सुरेशसिंह बघेले, विनायक देशमुख, दिलीप मासूरकर, जया भुरे, ओम गायकवाड, विष्णू रणदिवे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.