अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा-खा.पटेल

0
17

सडक अर्जुनी,दि.25: केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. मात्र मागील चार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक हे सारचे त्रस्त आहेत. त्यामुळे जनतेला अच्छे दिन येणारची खोटी स्वप्ने दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी येथे केले.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपा, पिरीपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
या वेळी माजी आ. रामरतन राऊत, प्रदेश सदस्य मनोहर चंद्रिकापुरे, माजी सभापती राजेश नंदागवळी, माजी जि.प.सदस्य मिलन राऊत, जि.प.सदस्य सरीता कापगते, डॉ. अविनाश काशिवार, हिरालाल चव्हाण, छाया चव्हाण, रजनी गिऱ्हेपुंजे, यदवती उईके, गजानन परशुरामकर, सा.का.अल्लाउद्दीन राजानी, आनंद इळपाते, धनलाल मानवटकर, सरपंच शालिकराम भेंडारकर उपस्थित होते.
पटेल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा फडणवीस सरकारने केली. मात्र आॅनलाईन आॅफ लाईनच्या तिढ्यामुळे अद्यापही शेतकरी कर्जमुक्त झाला नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चासह दीडपट मोबदला देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र ते आश्वासन सुध्दा फोल ठरले आहे. बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी झाले नाही. डिझेल, पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. २०१४ पासून ओबीसी विद्यार्थ्याना शिष्यवृत्तीचे वाटप झाले नाही. देशात नोटबंदी करुन सर्व सामान्य जनतेला लाईनमध्ये उभे ठेवण्याचे काम या सरकारने केले. शेतकऱ्यांना अद्यापही धानाच्या बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. आघाडी सरकारने २००८ मध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले होते. त्यावेळी आॅनलाईन आॅफलाईनचा तिढा निर्माण न करताच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता. मात्र आता केंद्र व राज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारला धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. यासाठी कुकडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन पटेल यांनी केले.