शिवराज्याभिषेक सोहळा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन 6 जून लोकोत्सव

0
19

समिती सदस्य भागवत देवसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
नांदेड दि. 29 -दुर्गराज किल्ले रायगडावर 6 जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 5 व 6 जूनला किल्ले रायगडावर उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने सदस्य भागवत देवसरकर यांनी शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.
सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी लोकशाहीच्या तत्त्वावर युगपुरूष छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली. अठरा अलुतेदार, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन शिवरायांनी आदर्श राज्याची घडी बसविली. लोककल्याणकारी राज्य असे असावे, याचा पायाच त्यांनी घालून दिला आणि अत्याचारात दबलेल्या रयतेला स्वाभिमानाचा अंकुर फुलला. हा अंकुर फुलविणाऱ्या छत्रपती शिवरायांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला व स्वराज्याला छत्रपती मिळाले. ही घटना केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षणांनी नोंदणारी ठरली. हा दिन म्हणजे भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन, हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे. राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे दुर्गराज रायगडावर राज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा 5 व 6 जूनला विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.
छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून येणाऱ्या शिवभक्तांमुळे रायगडावर लाखो शिवभक्तांची मांदीयाळी जमणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहासप्रेमी उपस्थित राहणार आहेत. गडावर 5 व 6 जूनला वैविद्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्याचे रक्षण सह्याद्रीच्या गडकोटांनी केले. शिवरायांना स्वराज्यासाठी याच गडकोटांचे भक्कम पाठबळ मिळाले, शिवछत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देणारे शेकडो गडकिल्ले महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत. त्यांनी रायगड किल्ल्याचे संवर्धन व विकास होण्यासाठी भरघोष निधी आणला. शासनाकडून त्याचा विकास आराखडा तयार झाला आहे, तसेच रायगड संवर्धनाचे प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना ही सर्व मावळ्यांना बरोबर घेऊन केली. तोच आदर्श, तीच प्रेरणा घेऊन युवराज छत्रपती संभाजीराजे कार्यरत आहेत.
राज्यभिषेक सोहळ्याची रूपरेषा :
यंदा संभाजीराजेंच्या संकल्पनेतून रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त, दुर्गप्रेमी, इतिहास संशोधक, वास्तुतज्ज्ञ, पर्यावरण प्रेमी, प्रशासन, स्थानिक रहिवाशी यांच्या सहभागातून 5 जूनला सकाळी 7 ते दुपारी 12 यावेळेत रायगडची स्वच्छता मोहीम होत आहे. दुपारी साडेबारा वाजता गडावरील अन्नछत्राचे उद्‌घाटन होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती गड पायथा, चित्त दरवाजा येथून शेकडो शिवभक्तांसमवेत गडावर चालण्यास प्रारंभ करतील. दुपारी 4.30 वाजता गडपूजन 21 गावातील सरपंच व पंचक्रोशीतील ग्रामकन्यांच्या उपस्थितीत नगारखाना येथे होईल. सायंकाळी 6 वाजता संभाजीराजे यांच्या हस्ते गडावर उत्सननात मिळालेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन हत्तीखाना येथे होणार आहे. त्यानंतर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, शाहिरी कार्यक्रम होणार आहे. संभाजीराजे छत्रपती शिवभक्तांशी थेट रात्री आठ ते नऊ या वेळेत संवाद साधतील. रात्री 8.30 वाजता गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, तर रात्री 9 वाजता जगदीश्वर मंदिर येथे वारकरी मंडळांच्याकडून जागर घातला जाणार आहे. रात्री 9 वाजता राजसदरेवर ही रात्र शाहिरांची कार्यक्रम होईल.
6 जूनला शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा होणार आहे. सकाळी सहा वाजता ध्वजपूजन, शाहिरी कार्यक्रम होईल. शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत केले जाईल. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करतील व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा शुभारंभ होऊन जगदिश्वर मंदिर व शिवाजी महाराजांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता होईल. या सोहळ्यास नांदेड जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भागवत देवसरकर यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघाचे प्रशिक्षक प्रा. संतोष देवराये, जिल्हा कार्याध्यक्ष नानाराव कल्याणकर, राजेश मोरे, अवधूत पवार, मंगेश कदम, बाळासाहेब देसाई, उद्धव पाटील सूर्यवंशी, जिल्हा सचिव रमेश पवार, सतीश जाधव, मराठा उद्योजक कक्षाचे धनंजय पाटील, कृषी परिषदेचे परमेश्वर काळे, सुनील ताकतोडे, व्यंकटराव जाधव, तिरूपती भगनुरे पाटील, वैशाली माने, प्रशांत आबादार, आत्माराम शिंदे, दीपक पवार, शंकर पवार, आदित्य शिरफुले, नरहरी लांगे, संगम लांडगे, महेश जाधव, कृष्णा जंगेवार, रमेश पवार, प्रतिक लहानकर, गजानन घोरबांड, दत्ता शिंदे, गोविंद अंबोरे, अक्षय जाधव यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.