श्रीनगर(वृत्तसंस्था),दि.20: जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे. भाजपाने पीडीपीची साथ सोडल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार काल कोसळले. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनंदेखील सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केले होते. त्यामुळे राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात यावे, अशी शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. याला कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे.
काल भाजपाने जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार कोसळले. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपाल वोहरा यांनी मुफ्ती, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी. ए. मीर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी, अशी शिफारस वोहरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती.