जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावे – राज्यमंत्री दादाजी भुसे

0
12

मुंबई,दि.27 : राज्यातील जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गाच्या मागण्या व अडचणी, महाराष्ट्रातील सर्व हातपंप देखभाल व दुरूस्ती ट्रायसेम कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित सामावून घेण्याबाबत तसेच परिचर पदावरून सहायक पदावर पदोन्नती मिळणेबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांच्या वेतनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मार्गदर्शनासाठी पाठवावा, असेही श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.परिचर पदावरून सहायक पदावर पदोन्नती मिळणे, जिल्हा परिषदांमध्ये हातपंप देखभाल दुरूस्तीसाठी कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय तातडीने घेण्याबाबत राज्यमंत्री श्री.भुसे यांनी विभागाला निर्देश दिले. यावेळी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.