एव्हरेस्ट मोहिमेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

0
11

मुंबई, दि. 29 : मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट मोहिमेत लयांचे राष्ट्रपतीसहभागी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रधानमंत्री मोदी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच त्यांचे अनुभव ऐकून भविष्याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते.
राज्यात एकात्मिक आदिवासी प्रकल्प राबविण्यात येत असून त्याअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांतील नैसर्गिक काटकपणा व साहसीवृत्तीला वाव मिळावा यासाठी ‘मिशन शौर्य’ची आखणी करण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत विकास सोयाम, शुभम पेंदोर, उमाकांत मडावी, छाया आत्राम, इंदू कण्णके, मनीषा धुर्वे, आकाश आत्राम, कविदास काटमोडे, आकाश मडावी आणि प्रमेश आळे या मुलांनी एव्हरेस्टवर चढाई केली होती. या मोहिमेतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच कौतुक केले होते. आज या विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेतली. प्रधानमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील,गोंदिया जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्कालीन वरोराचे उपजिल्हाधिकारी डाॅ.एम.राजा दयानिधी आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विविध प्रकल्पांची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. विशेषतः भारतनेट प्रकल्पांतर्गत महानेट हा प्रकल्प राज्यात राबविण्यात येत असून त्यामाध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा कसा बदलता येईल याबाबतचे पत्रही त्यांनी दिले.