वर्षभरानंतरही कर्जमाफीचा घोळ कायम-अनिल देशमुख

0
7

नागपूर,दि.4 : सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करून एक वर्ष पूर्ण झाले. परंतु अद्यापही शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. आॅक्टोबर महिन्यात सरकारने जाहिराती देऊन ९० टक्के शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा केल्याचा दावा केला होता. परंतु प्रत्यक्षात तसे झालेच नाही. सरकारला कर्ज माफी करायची नसल्याने त्यांनी यात घोळ निर्माण केला आहे, असा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
देशमुख म्हणाले, तीन वर्षापासून आर्थिक टंचाईत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून एकाही रुपयाची मदत मिळालेली नाही. पेरणीच्या हंगामात शेतकरी खते व बियाणे कसे घ्यावे या चिंतेत आहे. असे असतानाही बँका शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम व्याजासह भरण्यासाठी तगादा लावत आहेत. ही रक्कम भरण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना ३० जून पर्यंतची मुदत दिली होती. पेरणीसाठी पैसे गोळा करावे की बँकांचे थकीत कर्ज भरावे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. जून २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ३१ आॅक्टोबरला राज्य सरकारने जाहिराती देत ३४ हजार २२ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून याचा लाभ ७० लाख शेतकऱ्यांना होईल व ९० टक्के शेतकºयांचा सातबारा कोरा होईल, असा दावा केला होता. परंतु, अद्यापही फारच कमी १० टक्के शेतकऱ्यांचाही सातबारा कोरा झालेला नाही. फसव्या जाहिराती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार सरकारने केला आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला आहे.