नपच्या २० कोटींच्या रस्ते बांधकामाची चौकशी करा- नगरसेवक खोब्रागडे

0
9

गोंदिया,दि.06 – राज्य शासनाने गोंदिया शहर विकासाठी नगर परिषदेला रस्ते बांधकामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, नगर परिषदेमार्फत करण्यात येत असलेली सर्व कामे ही निकृष्ट दर्जाची आहेत. या सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी करून उर्वरीत  कामे थांबवून संबधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर कामांची उच्चस्तरीय चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा त्यांनी इशारा निवेदनातून दिला आहे.  

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, गोंदिया शहरात विविध विकासकामांकरीता महाराष्ट्र शासनामार्फत २० कोटी रूपये मंजूर करण्यात आले. त्याअंतर्गत गोंदिया नगर परिषदेमार्फत गोंदिया शहरात विविध रस्त्यांचे कामे सुरू आहेत. ज्यामध्ये दलित वस्ती सुधार योजना, विशेष रस्ता अनुदान योजना, दलित्तेतर अनुदान योजना, नगर उत्थान योजना या योजनेतंर्गत २० कोटी रूपयांचे कामे निवेदेप्रमाणे सुरू आहेत.  मात्र, हे कामे संबंधीत कंत्राटदारालाच मिळावे म्हणून नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने अटी व शर्तींना (आरएमसी) डावलून सदर निधीचा संबंधीत कंत्राटदारालाच फायदा व्हावा म्हणून नगर परिषदेच्या निधीचा दुरुपयोग व विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. तरी सदर सुरू असलेली कामे थांबवून व जे कामे करण्यात आलेली आहेत. त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, व ही चौकशी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, गुणवता व नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत करण्यात यावी. तसेच वार्ड क्रमांक १६ मध्ये खोटे इस्टीमेट तयार करून काही रस्ते अर्धवट बांधकाम करून वाऱ्यावर सोडले. गोंदिया शहरात जे काही रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्या सर्व रस्त्यांची गुणवत्ता तपासून चौकशी करण्यात यावी. तेव्हाच सदर कंत्राटदारांचे बिले नगर परिषदेकडून पारित करण्यात यावी. तसेच आतापर्यंत ज्या रस्त्यांची कामे अद्याप सुरू झाली नाहीत किंवा निविदा काढण्यात आल्या नाहीत. आता पुन्हा नगरोत्थान योजनेतंर्गत १० कोटी रुपये कामांची प्रत्येक प्रभागात तरतुद करण्यात आलेली आहे. त्या कमाची ७ ऑगस्ट २०१८ रोजी निविदा भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यावर  स्थगिती देण्यात यावी. जर ही प्रक्रिया येत्या दोन दिवसात पूर्ण झाली नाही तर, उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांनी दिला आहे.