राज्यात ६१५ नक्षल्यांचे आत्मसमर्पण

0
5
file photo

गडचिरोलीतील ५९६ नक्षलवाद्यांनी धरली नवजीवनाची वाट
नागपूर, दि. १४ – लोकशाही व्यवस्थेतच आदिवासी बांधवांचा विकास शक्य असल्याची जाणीव झाल्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून आत्तापर्यंत ६१५ नक्षलवाद्यांची आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. यात सर्वाधिक गडचिरोली जिल्ह्यातील ५९६ नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
आदिवासी बांधवाच्या हितासाठी लढण्याची भाषा करून स्वतः सुखी संपन्न असलेले नक्षली नेते राज्यातील आदिवासी भागातील तरूण-तरूणींना, तसेच लहान मुलांना खोट्या भुलथापा देऊन आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांचे मन परिवर्तन करून त्यांना नक्षलवादी बनवितात. त्यातच या तरूण-तरूणींना काही वर्षातच आपण भरकटले गेलो असल्याची जाणीव निर्माण होते. मात्र बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला वरिष्ठ नक्षल्यांच्या आदेशाने जिवे मारण्यात येईल, पोलिस पकडतील किंवा मारून टाकतील, अशी भिती सहकारी नक्षलवाद्यांकडून दाखविली जाते. त्यामुळे हे तरूण अडगळीत अडकून मनाविरूध्द नक्षल्यांना साथ देत असतात. अनेकांना यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नाही.
त्यामुळे नक्षल चळवळीत भरकटलेला आदिवासी बांधव लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात यावा, या उद्देशाने राज्य शासनाने २९ ऑगस्ट २००५ पासून आत्मसमर्पण योजना सुरु केली. योजना सुरु झाल्यानंतर लगेच एका महिन्यात म्हणजे २५ सप्टेंबर २००५ रोजी नक्षली चळवळीत दलम सदस्य असलेला जहाल नक्षलवादी मदनअय्या उर्फ बालना बलय्या याच्या आत्मसमर्पणाने योजनेला पहिले यश प्राप्त झाले. आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून सन २००५ ते जुन २०१८ या कालावधीत गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ६१५ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यात केवळ गडचिरोली जिल्ह्यातील ५९६, तर गोंदिया जिल्ह्यातील १७ व चंद्रपूर जिल्ह्यातील २ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यामध्ये १ दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटी सदस्य, ६ डिव्हीजनल कमेटी सदस्य, २५ कमांडर, २९ उपकमांडर, ३१५ दलम सदस्य, ११५ क्षेत्रीय/ग्रामरक्षक दल सदस्य, १२४ संगम सदस्य यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण ७ दलम सदस्य, ५ क्षेत्रीय/ ग्रामरक्षक दल सदस्य, ६५ संगम सदस्य अशा एकूण ७७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली. त्यात गडचिरोलीतील ६७ व गोंदिया येथील १० नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
दुस-या टप्प्यात गडचिरोली येथील २ उपकमांडर, १० दलम सदस्य, १ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, ४ संगम सदस्य अशा एकूण १७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. तिस-या टप्प्यात २ उपकमांडर, २७ दलम सदस्य, १५ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, ३१ संगम सदस्य अशा एकूण ७५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात गोंदियातील एका नक्षलवाद्याचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात ३ कमांडर, ३ उपकमांडर, २७ दलम सदस्य, ७६ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, २४ संगम सदस्य अशा एकूण १३३ नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला.
पाचव्या टप्प्यात १ दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटी सदस्य रैना उर्फ रघू उर्फ जालमलाय लालुसाय सडमेक याने आत्मसमर्पण केल्यामुळे पोलिसांना फार मोठे यश प्राप्त झाले. तसेच १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ३ दलम कमांडर, २ उपकमांडर, २३ दलम सदस्य अशा ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात गडचिरोलीतील २८ व गोंदिया येथील २ नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
सहाव्या टप्प्यात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, १२ दलम सदस्य, २ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण १५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
सातव्या टप्प्यात ३ कमांडर, ३ उपकमांडर, १५ दलम सदस्य अशा एकूण २१ नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला. आठव्या टप्प्यात २ कमांडर, ७ दलम सदस्य, ३ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण १२ नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला. त्यात गडचिरोलीतील ११ व चंद्रपूरातील एका नक्षलवाद्याचा समावेश आहे.
नवव्या टप्प्यात २ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ४ कमांडर, २ उपकमांडर, ३५ दलम सदस्य, ४ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण ४७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात ४५ गडचिरोलीतील १ यवतमाळ व १ गोंदिया येथील नक्षलवाद्याचा समावेश आहे.
दहाव्या टप्प्यात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ३ कमांडर, ७ उपकमांडर, ६२ दलम सदस्य, २ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण ७५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात ३ गोंदिया येथील नक्षलवाद्याचा समावेश आहे.
अकराव्या टप्प्यात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ६ कमांडर, ६ उपकमांडर, ७८ दलम सदस्य, ७ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण ९८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
बाराव्या टप्प्यात जुन २०१८ पर्यंत १ कमांडर, २ उपकमांडर, १२ दलम सदस्य अशा एकूण १५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

नक्षलवाद्यांनो लोकशाहीचा मार्ग स्विकारा – शरद शेलार
नक्षल चळवळीतून बाहेर निघण्यासाठी राज्य शासन व पोलिस आत्मसमर्पण योजना राबवित आहेत. जंगलात नक्षलवाद्यांविरोधात लढा देणा-या पोलिसांकड़ून जनसंवादावर विशेष भर देण्यात येत आहे. म्हणूनच सध्या मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारत आहेत. शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत व इतर लाभ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना देण्यात येत आहेत. त्यामुळेच आत्मसमर्पित झालेले नक्षलवादी सध्या सुखी समाधानाचे आयुष्य जगत आहेत. त्यांना रहायला भुखंड व रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. जंगलातील इतर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी केले आहे.