जिल्हा नियोजनचे प्रस्ताव पंधरा दिवसात सादर करा-पालकमंत्री बडोले

0
10

गोंदिया,दि.१७ : जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करण्यात येते. सन २०१८-१९ मध्ये तिन्ही योजना मिळून २६७ कोटी ६१ लाखांचा नियतव्यय मंजूर असून हा खर्च करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. यासाठी निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव पंधरा दिवसात नियोजन विभागाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, खासदार मधुकर कुकडे, आमदार गोपालदास अग्रवाल, संजय पुराम, विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपायुक्त नियोजन श्री. फिरके, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत सन २०१७-१८ च्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. मागील वर्षी तिन्ही योजना मिळून २५७ कोटी १९ लाख ८८ हजार नियतव्यय मंजूर होता. त्यापैकी २५४ कोटी १७ लाख ३ हजार एवढा खर्च झाला असून खर्चाची टक्केवारी ९८.८२ एवढी आहे. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, यंत्रणांनी निधी मागणीसाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. प्रस्ताव हे परिपूर्ण असावेत असेही त्यांनी सांगितले.
पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरुस्ती, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, शाळांची आवार भिंत, तालुका क्रीडा संकुलाचा वीज पुरवठा आदी विषय सदस्यांनी उपस्थित केले असता हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना ना. बडोले यांनी दिल्या. सडक अर्जुनी येथे सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र उघडण्यात येणार असून यासाठी क्रीडा विभागाने नियोजन करावे असे ते म्हणाले. जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांना नुकसान झाल्यामुळे सन २०१७-१८ ची लीज कॅरी फॉरवर्ड करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली असता प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकामासाठी ३.५० कोटी रुपये तर अंगणवाडी बांधकाम या योजनेसाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तालुका क्रीडा संकुल गोरेगाव येथील निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त पदांचा आढावा आमदार व शासन स्तरावर घेण्यात येऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचे बैठकीत ठरले.
गोंदिया शहरातील तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव नगर पालिकेने पाठवावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. गोंदिया शहरातील अतिक्रमण व शहर विकास आराखडा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. सिकलसेल कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावा असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मलेरिया निर्मूलनासाठी ग्रामपंचायतनी काय उपाययोजना केल्या याबाबत माहिती सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, उज्ज्वला गॅस योजना, मुद्रा योजना, पट्टे वाटप, धान्य वाटप, मामा तलाव दुरुस्ती आदी योजनांचा जिल्हाधिकारी यांनी विशेष आढावा घेण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
अनुसूचित जाती उप योजनेत वैयक्तिक लाभाच्या योजना प्राधान्याने राबविण्यात याव्यात असे पालकमंत्री म्हणाले. रमाई घरकुल व प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी असे ते म्हणाले. केंद्र व राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजना प्राधान्याने राबवून त्याचा लाभ गरजू व्यक्तींना मिळाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. या बैठकीला विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीचे संचलन जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती भूत यांनी केले.
देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना उपस्थित सर्व सदस्य व अधिकाऱ्यांनी दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.