भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात

0
10

अकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावर आणून पूरामध्ये फेकून देण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा 48 तासात लावत संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे.त्यामध्ये उशिरा वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ज्योती गणेशपुरे, ज्योतीच्या बहिणीची मुले आणि तिच्या मुलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मारेकऱ्यांनी आसिफ खान यांच्या हत्येची कबुली दिली असून, त्यांचा मृतदेह पूर्णा नदीच्या पुरात फेकून दिल्याचेही त्यांनी कबूल केले आहे; मात्र आसिफ खान यांचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही.पोलीस अधिक्षक कलासागर यांनी स्वतःघटनास्थळाला भेट देऊन तपास कार्याचा आढावा घेतला.

आसिफ खान यांना गुरुवारी 16 ऑगस्टला ज्योती गणेशपुरे यांचा फोन आला होता. तिने आसिफ खान यांना मूर्तिजापूर येथे तिच्या बहिणीकडे भेटायला बोलावले होते. तेव्हापासून आसिफ खान बेपत्ता होते, अशी तक्रार आसिफ खान यांचा मुलगा डॉ. सोहेल खान यांनी बाळापुर पोलिसात दिली होती. आसिफ खान यांचा शोध सुरू केला असता, त्यांची कार म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या काठावर चालू अवस्थेत दिसून आली होती. या कारमध्ये पोलिसांच्या हाती संशयास्पद पुरावे हाती लागले होते. त्यावरून पोलिसांनी तपासाला गती दिली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या पथकाने रविवारी ज्योती गणेशपुरे हिला मुंबईहून ताब्यात घेतले. तसेच मुर्तीजापुर येथून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता आसिफ खान यांची हत्या झाल्याचे समोर आले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी आसिफ खान यांच्याच गाडीत त्यांचा मृतदेह आणला व म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावरुन पुराच्या मध्यभागी फेकून दिला. रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आरोपीला घेऊन घटनास्थळावर गेले होते. ज्या ठिकाणी आसिफ खान यांचा मृतदेह नदीत फेकण्यात आला ती जागा आरोपींनी पोलिसांना दाखवली. खून करण्याची पद्धत, खून कोणी केला, विल्हेवाट कशी लावली, कोणत्या कारणासाठी आरोपीने टोकाचे पाऊल उचलले त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींची कसून चौकशी करीत असून लवकरच याचा उलगडा होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांनी दिली आहे.