जलयुक्त शिवार अभियान उत्कृष्ट योगदानासाठी पत्रकारांना पुरस्कार २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका आमंत्रित

0
23

 वाशिम, दि. १५ : राज्यातील टंचाईवर कायमस्वरुपी उपाय योजना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या अभियानातंर्गत प्रसिध्दीसाठी बातमीदार, माध्यम प्रतिनिधींना जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर प्रथम, व्दितीय आणि तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी २५ सप्टेंबर २०१८ पर्यंत विहित नमुन्यातील प्रवेशिका जिल्हा माहिती कार्यालयत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगाने उत्कृष्ट लिखाणाद्वारे वृत्तपत्रातून जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारास पुरस्कार देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी बातमीदारांनी १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीतील प्रकाशित झालेले साहित्य तीन प्रतीत सादर करावे. आपल्या लिखाणाद्वारे वृत्तपत्रातून जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणारे पत्रकार आणि जलयुक्त शिवार अभियानाची त्या- त्या परिसरातील जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर,पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यात योगदान देणारे पत्रकार या पुरस्कारासाठी पात्र राहतील.

जिल्हास्तरावरील पुरस्काराची निवड जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीद्वारे करण्यात येईल. जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी प्रथम पुरस्कार ३१ हजार रुपये, द्वितीय पुरस्कार २१ हजार रुपये व तृतीय पुरस्कार १५ हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह अशा स्वरुपात देण्यात येणार आहे. तर विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार देण्यात येणार असून यामध्ये प्रथम ५० हजार रुपये, द्वितीय ३५ हजार रुपये व तृतीय २५ हजार रुपये रोख रक्कम देण्यात येईल. तसेच राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कारामध्ये प्रथम १ लक्ष रुपये, द्वितीय ७१ हजार रुपये व तृतीय ५१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मिडीया मधील मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरावर प्रथम १ लाख रुपये, द्वितीय ७१ हजार रुपये व तृतीय ५१ हजार रुपयाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.