मच्छीमार संस्थेची लीज माफ करणार- पटोले

0
8

साकोली ,दि.29ः-मत्स्य व्यवसाय करणारा ढिवर, कहार समाज हा झोपडीत जन्माला येतो आणि झोपडीतच मरण पावतो. स्वातंत्र्याला साठ वर्षापेक्षा जास्त वर्ष लोटले तरी आजही हा समाज अशिक्षितपणामुळे पारंपरिक मासेमारीच्या व्यवसाय करून जीवन जगत आहे. मात्र, भाजप सरकारचे या समाजाकडे दुर्लक्ष असल्यामुळे तलावांच्या लीजमध्ये दिवसेंदिवस सात ते आठ पटीने वाढ होत आहे. शासनातर्फे ही लीज माफ झाली पाहिजे. मात्र, शासन याकडे दुर्लक्ष करते. मात्र येत्या काळात मच्छीमार संस्थेची लीज कायमस्वरूपी माफ करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय व तलाव बचाव संघर्ष समिती भंडारा- गोंदिया व जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने मंगलमुर्ती सभागृह साकोली येथे धनादेश वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मंचावर खासदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, संचालक प्रशांत पवार, जिल्हा परीषद सभापती रेखा वासनिक, सभापती प्रेमदास वनवे, जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होमराज कापगते, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, मंदा गणवीर, मदन रामटेके, प्रा. संजय केवट, चुन्नीलाल वासनिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी साकोली, लाखनी, लाखांदूर, तुमसर, मोहाडी, भंडारा व पवनी तालुक्यातील एकूण १६0 मच्छीमार संघटनांचे १८ लाख ३0 हजार रूपयांची लीज धनादेशाद्वारे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परत करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव वलथरे यांनी केले. कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यातील मासेमार समाजबांधव उपस्थित होते.